शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…

| Updated on: Dec 28, 2020 | 7:19 PM

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. (NCP chief Sharad pawar on suicides in farmers protest)

शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर...
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे. (NCP chief Sharad pawar on suicides in farmers protest)

गेल्या महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत आले आहेत. आज त्यांनी काही विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यातून काही मार्ग निघणार नाही का? सर्वजण आत्महत्येच्याच मार्गाने जाणार आहेत का? त्यामुळे राजकीय पक्षांनाही याबाबतचा विचार करावा लागेल. आता केंद्राने 30 तारखेला शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. ठिक आहे. 30 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यातून तोडगा निघाला नाही तर आम्हाला बसावं लागेल. विरोधी पक्षांना त्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे.

मला वाटतं सरकारने हे आंदोलन गंभीरपणे घेतलं पाहिजे. चर्चा करून तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच या आंदोलना दरम्यान पाच शेतकऱ्यांचा मृत्यूही झाल्याचं मी ऐकलं आहे. अशी परिस्थिती असेल तर देशासाठी ते योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकाही झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदनं दिल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कृषी कायद्याचं समर्थन करत विरोधकांनी भ्रमित केल्यामुळेच शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी पवार दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. (NCP chief Sharad pawar on suicides in farmers protest)

संबंधित बातम्या:

शरद पवार दिल्लीत; सरकार विरोधात मोर्चेबांधणी की यूपीएच्या अध्यक्षपदाची?

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ

(NCP chief Sharad pawar on suicides in farmers protest)