महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वात मोठा फटका, देशात पुन्हा मोदी, पण इंडिया आघाडीचीही मोठी झेप; सर्व्हे काय सांगतो?

| Updated on: Aug 25, 2023 | 7:48 AM

इंडिया टुडे सी व्होटरने लोकसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. आज निवडणुका झाल्यास देश आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय असेल यावर या सर्व्हेमध्ये भाष्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वात मोठा फटका, देशात पुन्हा मोदी, पण इंडिया आघाडीचीही मोठी झेप; सर्व्हे काय सांगतो?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : इंडिया टुडे सी व्होटरचा लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे जाहीर झाला आहे. या सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचंच सरकार येणार आहे. पण इंडिया आघाडीही मोठी झेप घेताना दिसणार आहे. त्यामुळे पुढील लोकसभेत विरोधकांची संख्याही मोठी असणार असल्याने मोदींसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तर, सर्व्हेनुसार महाराष्ट्रता महाविकास आघाडीच सरस ठरणार असून महायुतीला चांगली कामगिरी करता येणार नसल्याचं दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका बसणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या सर्व्हेनुसार निकाल आले तर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडिया टुडे सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार आज जर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यास एनडीएला 306 जागा मिळणार आहेत. तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळणार आहेत. इतरांना 44 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षनिहाय पाहता भाजप हाच देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येणार आहे. भाजपला 287 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळीही काँग्रेसला 100 चा आकडा पार करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसला अवघ्या 74 जागा मिळणार आहेत. तर इतरांना 182 जागा मिळताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

इंडिया आघाडीची झेप

या सर्व्हेनुसार एनडीएला 306 तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळणार आहेत. म्हणजे इंडिया आघाडी मोठी झेप घेताना दिसत आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभेत विरोधकांचं बळ मोठं असणार असून त्यामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीत देशातील आणखी काही पक्ष आल्यास हे चित्र अजून बदलण्याची शक्यता आहे. मात्र, हा सर्व्हे आताचा आहे. निवडणुकांना अजून वर्ष बाकी आहे. तोपर्यंत मतदारांचा कल अजूनही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरस

राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आहेत. दोन्ही पक्षाच्या फुटीर गटाने भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. तसेच भाजपच्या आघाडीतही प्रवेश केला आहे. मात्र, असं असूनही महायुतीला पाहिजे तसं बळ मिळताना दिसत नाही. चिरफाळ्या होऊनही महाविकास आघाडीच सरस ठरणार असल्याचं दिसून येत आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला 28 तर महायुतीला 20 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वाधिक नुकसान शिंदे गटाचं

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास सर्वाधिक नुकसान शिंदे गटाचं होणार असल्याचं हा सर्व्हे सांगतो. शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत. पण सर्व्हेनुसार शिंदे गट आणि अजितदादा गटाचे मिळून फक्त 5 खासदार निवडून येणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपला सर्वाधिक 15 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेसला 10 तर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या मिळून 18 जागा निवडून येणार असल्याचं दिसून येत आहे.