शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली NEET पुनर्परीक्षेच्या तयारीसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न

Dharmendra Pradhan : नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, आज याबाबत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यात विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली NEET पुनर्परीक्षेच्या तयारीसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
Dharmendra Pradhan Neet
Image Credit source: Google
| Updated on: May 19, 2026 | 6:02 PM

नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा नव्याने ही परीक्षा होणार आहे. आज याबाबत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेली उच्चस्तरीय बैठक पार पडली. मागील परीक्षेदरम्यान पेपर लीक, सुरक्षेतील त्रुटी आणि परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवस्थापनाचे आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र आता आगामी परीक्षेत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि त्रुटीरहित करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि साठवण, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आणि डिजिटल मॉनिटरिंग, उमेदवारांची कडक ओळख पडताळणी तसेच सोशल मीडियावर अफवा आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सर्व राज्यांतील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत समन्वय बैठका घेऊन परीक्षा व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त, सीलबंद प्रश्नपत्रिकांची देखरेख आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा केंद्रांवरील सतर्कता आणि सुरक्षा कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुविधांकडेही विशेष लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आजच्या बैठकीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक सुविधा, बसण्याची सोय आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. NEET-UG ही देशातील MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सर्वात मोठी राष्ट्रीय परीक्षा असल्याने तिची विश्वासार्हता कायम राखणे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Follow Us