Nitish Kumar Resign : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, जेडीयू-भाजपची युती अखेर तुटली

| Updated on: Aug 09, 2022 | 4:19 PM

जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. 2013 पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे.

Nitish Kumar Resign : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, जेडीयू-भाजपची युती अखेर तुटली
नितीश कुमार यांचा राजीनामा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू (JDU) आणि भाजप (BJP) यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. 2013 पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. दरम्यान, नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की सर्व आमदार आणि खासदारांनी एकमताने एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याचं ठरवलेलं, त्यानंतर मी राजीनामा दिला आहे.

नवं सरकार स्थापण्यासाठीही दावा

राजीनामा सादर केल्यानंतर नितीश कुमार यांनी नव्या सरकारचा दावा मांडला आहे. नितीश कुमार यांनी 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल फागू चौहान यांना सादर केल्याचे कळते. बिहार विधानसभेत भाजपचे 77, जेडीयू 45, काँग्रेस 19, सीपीआयएमएल (एल) नेतृत्वाखालील डावे 16 आणि आरजेडी 79 आमदार आहेत.

तेजस्वी यादव होणार उपमुख्यमंत्री

होणारे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव गृहखातेही स्वतःकडे ठेवणार आहेत. इतकंच नाही तर राजदचाच विधानसभा अध्यक्षही असणार हे निश्चित झालं आहे.नव्या सरकारची रूपरेषा जवळपास निश्चित झाली आहे. यावेळी राजदमध्ये तेजस्वी यादव सर्व परिस्थिती हाताळत असून लालूप्रसाद यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांंपासून भाजपपासून लांबच

मुख्यमंत्रिपद देण्याच्या बदल्यात नवीन सरकारमध्ये त्यांची भागीदारी चांगली राहावी म्हणून राजद दोन मोठी पदे आपल्या पारड्यात ठेवत आहे. नितीश कुमार यानी अनेक दिवसांपासून भाजपपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. सुमारे महिनाभरापूर्वी नितीश कुमार यांनी पन्नास मिनिटांहून अधिक काळ जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर तेजस्वी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार यांच्याबाबतचा सूर बदलताना दिसू लागला. आणि आता तर थेट भाजप सरकारच पडलं आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.