ट्रेन अचानक पूर्णपणे कलंडली, लोक एकमेकांवर पडले…; अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये काय घडलं?

| Updated on: Jun 03, 2023 | 7:04 AM

या अपघातातील जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत.

ट्रेन अचानक पूर्णपणे कलंडली, लोक एकमेकांवर पडले...; अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये काय घडलं?
Odisha train accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथे बहनागा स्टेशन जवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झालाय. तीन ट्रेन एकमेकांना धडकल्याने या अपघातात आतापर्यंत 233 लोक जागीच ठार झाले. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेस पटरीवरून उतरली. ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. काही डब्बे पटरी सोडून गेले. हा भयानक अपघात कसा झाला याची माहिती या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवासीने दिली आहे.

वंदना खटेड असं या महिलेचं नाव आहे. सुदैवाने ती या अपघातातून बचावली. तिने या अपघाताची माहिती दिली. अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये नेमकं काय झालं? याची माहिती तिने दिली. मी कोरोमंडल एक्सप्रेसने येत होते. ट्रेनच्या वॉशरूममध्ये गेले होते. वॉशरूममधून बाहेर आले तर समोरचं दृश्य पाहून हादरून गेले. ट्रेन पूर्णपणे वाकडी झाली होती. कलंडली होती. ट्रेन कलंडल्याने मलाही स्वत:ला सावरता येत नव्हतं. ट्रेनमधील सर्व सामान इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं होतं. लोक एकमेकांवर पडलेले होते. काय झालं हे समजायला मार्ग नव्हता. त्यानंतर आम्हाला बाहेर काढण्यात आलं, असं वंदनाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

प्रेतांच्या राशीच राशी

हा अनुभव सांगताना वंदना अत्यंत घाबरलेल्या होत्या. त्यांना सांगतानाही धाप लागत होती. समोरच प्रेताच्या राशी बघून अस्वस्थ वाटल्यासारख वाटत असल्याचंही त्या सांगत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, रुग्णांची संख्या अधिक असल्याने बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

कालपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून एकही रेल्वे धावणार नसल्याचं राज्याचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं.

हेल्प नंबर जारी

हावड़ा- 033 – 26382217

खड़गपूर- 8972073925, 9332392339

बालासोर- 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) – 9903370746

रेल्वे मदत- 044- 2535 4771

ममता बॅनर्जींकडून शोक

दरम्यान, या अपघाताबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ओडिशातील रेल्वे अपघातातील बचाव कार्यासाठी पश्चिम बंगाल सरकार ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधून आहे. बंगाल सरकार ओडिशाच्या मदतीसाठी पाच ते सहा सदस्यांची टीम पाठवत आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.