2 दिवसांत येतो म्हणत आईला सोडून गेला, मृत्यूनंतरही पाझर नाही फुटला.. त्या वृद्धेची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

अलीकडच्या काही घटनांनी वृद्धावस्थेतील आई-वडिलांना मुलांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आयुष्यभर कष्ट करून मुलांना वाढवणाऱ्या पालकांना, मुलांकडून वृद्धाश्रमात एकटं सोडलं जातं. इंदौर येथे महिलेने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाची वाट पाहिली, पण तो आलाच नाही.

2 दिवसांत येतो म्हणत आईला सोडून गेला, मृत्यूनंतरही पाझर नाही फुटला.. त्या वृद्धेची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
Image Credit source: social media
| Updated on: Aug 18, 2026 | 3:02 PM

आई-वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून, अक्षरश: आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना चांगलं आयुष्य, सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश मुलांना आई-वडीलांच्या कष्टांची जाणीव असते, मोठेपणी ते त्यांची काळजी घेताना दिसतात, त्यांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र काही वेळा अशा घटना समोर येतात जिथे मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वीच हरियाणातील सोनीपत येथे एका वृद्ध इसमाचा त्याचया तीन मुलींची वाट पहात पहात वृद्धाश्रमात मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही त्या मुी आल्या नाही, फक्त व्हिडीओ कॉलवर शेवटचं दर्शन घेतलं. हे प्रकरण समोर आल्यावर प्रचंड खळबळ माजली होती. वृद्ध वडिलांची भेट घेण्यासाठीही वेळ नसलेल्या मुलींबद्दल बरीच उलट सुलट चर्चा झाली. मात्र हे प्रकरण अजून ताजं असतानाच आता इंदौरमधूनही अशीच, हृदयाला पीळ पाडणारी एक घटना समोर आली आहे.तिथे वृद्धाश्रमात राहणारी एक वृद्ध स्त्री तब्बल साडेचार वर्ष तिच्या मुलाची वाट पहात होती. मी दोन दिवसांत येतो असं सांगून जो मुलगा निघून गेला होता, तो मात्र कधीच आपलया वृद्ध आईला परत नेण्यासाठी आलाच नाही. आयुष्याच्या अखेरच्या क्षणीही ती महिला मुलाच्या भेटीसाठी आसुसली होती पण तिने अखेरचे डोळे मिटल्यावरही तो मुलगा अखेरचा निरोप देण्यासाठीही तिथे आला नाहीच.

मीटिंगच्या बहाण्याने आश्रमात सोडलं, 2 दिवसांत परत येण्याचं दिलं होतं वचन

85 वर्षीय सरिता नारायणे यांना त्यांचा मुलगा जानेवारी 2022 मध्ये इंदूरमधील निराश्रित आश्रमात सोडून गेला होता. माझी मीटिंग आहे आणि फक्त दोन दिवसात मी परत येऊन आईला घेऊन जाईन, असं त्याने आश्रम व्यवस्थापनाला सांगितलं होतं. मुलाचे हे बोलणं ऐकून सरिता यांना विश्वास होता की, तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी नक्की परत येईल. मात्र दोन दिवस गेले, त्यानंतर महिने उलटले आणि पाहता पाहता तब्बल साडेचार वर्षे निघून गेली. तो मुलगा काही परत आलाच नाही.

आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरिता या नेहमी आपल्या मुलाबद्दल विचारायच्या. त्याची भेट व्हावी आणि पुन्हा मुलाच्या घरी जावं, अशी त्यांची इच्छा होती. वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. डोळ्यांची दृष्टीही कमी झाली. दानशूर व्यक्तींच्या मदतीने आश्रमाने त्यांच्यासाठी चष्म्याची व्यवस्था केली आणि आवश्यक उपचारही करून घेतले. मात्र दुसरीकडे सरिता यांच्या मुलाने, त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला आणि तो दुसरीकडेच रहायला गेल्याचही समोर आलं. आश्रम व्यवस्थापनाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

निधनाची बातमी कळवूनही मुलगा आला नाही

10 ऑगस्ट रोजी सरिता नारायणे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन झाल्याची माहिती आश्रम व्यवस्थापनाने त्याच्या मुलाला दिली. मात्र यावेळीही त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आईच्या अंत्यदर्शनासाठी मुलगा येईल, या आशेने आश्रमातील लोकांनी तब्बल तीन दिवस त्याची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. अखेर आश्रमातील कर्मचाऱ्यांनीच सरिता यांना आपल्या आईप्रमाणे सन्मान देत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

आईचं घरही विकल्याचा आश्रमाचा दावा

आश्रम व्यवस्थापनाच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाने सरिता यांचं घरही विकलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या आईशी संपर्क पूर्णपणे तोडला. ज्या घरासाठी आणि मुलाच्या संगोपनासाठी सरिता यांनी आयुष्यभर कष्ट घेतले, त्याच घरापासून दूर वृद्धाश्रमात त्याच्या परतीची वाट पाहत त्या राहिल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा आपल्याला भेटायला येईल, अशी सरिता यांना शेवटपर्यंत आशा होती. आश्रमाने आपल्या परीने त्यांची काळजी घेतली आणि उपचारांसह चष्म्याचीही व्यवस्था केली, असं त्यांनी सांगितलं. आयुष्यभर मुलासाठी झटलेल्या या आईला अखेरच्या क्षणीही मुलाची साथ मिळाली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us