JP Nadda Meeet CJP Leaders : प्रधान यांना एक-दोन दिवसात बर्खास्त करा नाही तर, मग..CJP कडून बैठकीतली Inside Story जाहीर
JP Nadda Meeet CJP Leaders : "सरकारच्यावतीने मी आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी सीजेपीचं म्हणणं ऐकलं. सौहार्दपूर्ण वातावरणात आमची चर्चा झाली. त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. पाच सुधारणा सुचवल्या. उद्या दुपारी पुन्हा आम्ही भेटणार आहोत" असं जेपी नड्डा यांनी सांगितलं.

“आमचा पाच पॉइंटचा अजेंडा जो वैष्णवीने बनवला आहे, तो आम्ही लोकांसमोर सार्वजनिक केला आहे. सरकारने त्यावर विचार करावा. आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. दिल्ली पोलिस सध्या जे युवा दिसतात त्यांना ताब्यात घेत आहेत. काल रात्री निजामुद्दीन जवळ दोन लहान मुलं जेवण घेऊन येत होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर मुलांना सोडलं. पण जेवण दिलं नाही. अशा प्रकारच्या घटना होत आहेत. आम्ही मंत्र्यांसमोर हे मांडलं, ते म्हणाले यापुढे असं होणार नाही” असं सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास बैठकीनंतर म्हणाला. “नुकसान भरपाई आणि भविष्यात पुन्हा एफआयआर दाखल होणार नाही या दोन डिमांड सरकारने मान्य करण्यासाठी सकारात्मकता दाखवलीय” असं सौरव म्हणाला.
“सर्वात विस्तृत चर्चा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर झाली. सरकारने त्यांच्यावतीने बऱ्यात गोष्टी सांगितल्या. आम्ही एकच बोललो, ज्या 21 मुलांनी नीट पेपर लीक झाला म्हणून आपलं जीवन संपवलं, त्याची जबाबदारी कोणाची? आम्ही स्पष्ट केलं की, धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड होऊ शकत नाही” असं कॉकरोच जनता पार्टीचा नेते आशुतोष रांका म्हणाला. “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी इथे प्रदर्शन चालू आहे. प्रदर्शन बंद होणार नाही. संपूर्ण देशात शिक्षणाबद्दल वेगवेगळ्या मागण्या होत असल्या तरी संपूर्ण देशाची एकच मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा” असं रांका म्हणाला. सरकारच्या शिष्टमंडळाने उद्या दुपारी 3.30 वाजता आम्हाला पुन्हा बोलावलं आहे असं आशुतोष रांका यांनी सांगितलं.
आपण विजयाच्या खूप जवळ
“आम्ही सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलय की, आता आम्ही जास्त वेळ वाया घालवू शकत नाही, प्रधान यांचा राजीनामा झाला नाही, एक-दोन दिवसात बर्खास्त केलं नाही तर सीजेपीकडून एक नॅशनल कॉल दिला जाईल, 20 जुलै सारखा. आम्ही सरकारला सांगितलय की यापुढचं आंदोलन 20 जुलैपेक्षा मोठं होईल. राष्ट्रीय स्तरावरच आंदोलन असेल. आम्ही सरकारला समजावलय ते समजले असतील” असं रांका यांनी सांगितलं. “देशभरातील प्रदर्शनाची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यांच्या राजीनाम्यापेक्षा काही कमी नाही हे मोदींना जाऊन सांगा” असं आशुतोष रांका म्हणाले. अपेक्षा ठेवा, संघर्ष करा आपण विजयाच्या खूप जवळ आहोत असं सीजेपीकडून सांगण्यात आलं.