Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष… पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. धर्म विचारून कुटुंबीयांच्या समोरच जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या कुटुंबीयांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष... पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या
Pahalgam terror Attack
Image Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2026 | 9:53 PM

पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. लष्कर ए तोयेबाशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)’ या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. धार्मिक ओळखीच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. धर्म विचारून कुटुंबीयांच्या समोरच जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक नागरिक ठार झाले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) करत आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे, तर मदत करणाऱ्यांना अटक करून चौकशी सुरू आहे.

पहलगामजवळील बैसारन मैदानात झालेल्या या हल्ल्याला 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष उलटूनही या घटनेच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. वाचलेले लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांना अजूनही तीव्र मानसिक आघात सहन करावा लागत आहे. आपल्या डोळ्यासमोर पती, मुलगा किंवा कुटुंबीयांना गमावलेल्या कुटुंबांचे दु:ख आजही कमी झालेले नाही.

न पुसणाऱ्या आठवणी

अनेक कुटुंबांसाठी हा आघात वारंवार आठवतो. या हल्लाची अपडेच जेव्हा सरकारकडून दिली जाते किंवा सोशल मीडियावर याबाबत माहिती समोर येते तेव्हा त्या भीषण घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचीही आठवण त्यांना येते. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळले असले तरी त्यांचे दु:ख अजूनही तितकेच तीव्र आहे, असे पीडित कुटुंबीय सांगतात.

न्यायासाठी संघर्ष

कानपूरमधील व्यावसायिक शुभम द्विवेदी यांच्या पत्नी आयशान्य यांनी आपल्या डोळ्यासमोर पतीची हत्या होताना पाहिली. लग्नाला अवघे दोन महिने झाले होते. त्या स्वतःलाही ठार मारण्याची विनंती करत होत्या, पण दहशतवाद्यांनी ऐकले नाही. आज त्या आपल्या सासरच्यांसोबत राहत असून, शुभमची आठवण न येणारा एकही दिवस नाही, असे त्या सांगतात. त्यांना सरकारी नोकरी आणि पीडितांना शहीद दर्जा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

शांततेत दु:ख व्यक्त करणारी कुटुंबे

जयपूरमध्ये नीरज उध्वानी यांच्या कुटुंबाने मूकपणे दु:ख व्यक्त करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते या घटनेबद्दल बोलण्यापेक्षा प्रार्थना करून त्यांची आढवण करतात. गुजरातमधील भावनगर येथे परमार कुटुंबाने यतेश परमार आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा सुमित यांना गमावले. या घटनेमुळे त्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कुटुंब आता अधिक सावधपणे जीवन जगत आहे.

कुटुंबांवर परिणाम

बेंगळुरूमध्ये भारत भूषण यांच्या कुटुंबावर या घटनेचा खोल परिणाम झाला आहे. त्यांच्या पत्नी सुजाता या अजूनही त्या घटनेच्या आठवणीतून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देत जीवन पुढे नेत आहेत. इंदूरमध्ये जेनिफर या आपल्या पती सुशील नथानियल यांच्या मृत्यूच्या आठवणीतून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. हल्ल्याच्या वेळी पतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आजही त्या मानसिक धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा ऑस्टेन कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. शेजारी आणि समाजाकडून काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी अधिकृत मदत मर्यादितच राहिली आहे, असे कुटुंबीय सांगतात.

जखमा अजूनही जिवंत

देशभरातील विविध शहरांमध्ये असलेल्या पीडित कुटुंबांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कोणी शांततेत दु:ख सहन करत आहे, तर कोणी न्यायासाठी लढत आहे. हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, पहलगाममधील हिरवीगार दरी पुन्हा शांत झाली असली, तरी त्या घटनेतील जिवंत राहिलेल्यांच्या मनातील जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत.

 

Follow Us