मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील?, प्लान काय?; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा काय?

आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामीनावर बाहेर आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. दिल्लीत रोड शो आणि सभांना संबोधित केल्यानंतर आता केजरीवाल उत्तर प्रदेशात आले आहे. यूपीत आल्यावर त्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा पुढचा प्लान काय असू शकतो याची माहितीच त्यांनी दिली.

मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील?, प्लान काय?; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा काय?
arvind kejriwal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2024 | 1:43 PM

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवा यांनी आज लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मोठी विधाने केली आहेत. भाजप मोदींसाठी नव्हे तर अमित शाह यांच्यासाठी मतदान मागत आहे. सत्ता आल्यावर मोदी केवळ वर्षभरासाठीच पंतप्रधानपदी राहतील. त्यानंतर ते अमित शाह यांना पंतप्रधानपदी ठेवतील. या मार्गात अडथळा नको म्हणून योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाईल, असा गौप्यस्फोटच अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास योगी आदित्यनाथ यांना दोन ते तीन महिन्यात मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाणार आहे. त्यानंतर वर्षभरातच अमित शाह यांच्याकडे देशाची सूत्रे दिली जाणार आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. मात्र, 4 जून रोजी आमचंच सरकार येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपला संविधान बदलायचं आहे. त्यासाठीच ते 400 पारचा नारा देत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025मध्ये 75 वर्षाचे होत आहेत. भाजपच्या नियमानुसार 75 वर्षावरील व्यक्ती सक्रिय राजकारणात राहत नाही. भाजप या निर्णयाचं पालन करेल अशी आशा आहे. त्यामुळेच त्यांनी अमित शाह यांना त्यांचा वारस करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्येच शाह पंतप्रधान होतील, असा दावा त्यांनी केला.

प्लान पूर्ण तयार

अमित शाह यांना वारस करण्याचा निर्णय निर्णय मोदींनी घेतला आहे. त्यामुळेच आपल्या मार्गात अडचण असलेल्या नेत्यांना अमित शाह यांनी दूर सारले आहे. शिवराज सिंह चौहान, रमन सिंह, देवेंद्र फडणवीस, खट्टर, वसुंधरा राजे… सर्वांना एक एक करून संपवण्यात आलं आहे. आता त्यांच्या मार्गात एकच व्यक्ती आहे, जो अडसर बनू शकतो. त्यालाही हटवण्याचा पूर्ण प्लान करण्यात आला आहे, असा दावा केजरीवाल यांनी केलाय.

संविधानाची वाट लावायची आहे

भाजपला 400 जागा हव्या हवेत. मोठं काम करायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या लोकांना संविधानाची वाट लावायची आहे. त्यासाठीच यांना 400 जागा हव्या आहेत. पण माझ्या अंदाजानुसार भाजपला 220 पेक्षा अधिक जागा मिळणार नाही. त्यापेक्षा कमीच मिळतील. हरियाणा, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान आणि इतर राज्यात भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

आरक्षणावर हल्ला करणार

अखिलेश यादव यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप चितपट होत आहे. भाजप 400 पारचा नारा देत आहे. 400 जागा येताच भाजप सर्वात पहिला हल्ला आरक्षणावर करणार आहे. पण जनता त्यांना 140 जागांसाठी तडपवणार आहे. भाजपला काहीच मिळणार नाही, असं सांगतानाच आपल्याला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची लढाई लढायची आहे. संविधान वाचवायचं आहे, असं अखिलेश यादव म्हणाले.