केंद्रात मोठे फेरबदल? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, 23-24 सप्टेंबर रोजी…? पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये
पंतप्रधान मोदींच्या 23-24 सप्टेंबरच्या चिंतन बैठकीमुळे केंद्रात मोठे फेरबदल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सरकारचे कामकाज, धोरणांची अंमलबजावणी आणि भविष्यातील प्राधान्यक्रम यावर सखोल चर्चा होईल. ही बैठक संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची नांदी मानली जात आहे, ज्यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात दोन दिवसीय चिंतन बैठकीला संबोधित करणार आहेत. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचं कामकाज, धोरणात्मक निर्णय आणि भविष्यातील प्राधान्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे बैठकीचं टायमिंग पाहता राजकीय वर्तुळात आता कॅबिनेटमधील फेरबदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सरकारने याबाबत अधिकृत असं स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसोबत सरकारच्या कामकाजाची समीक्षा केली जाणार आहे. सरकारच्या योजना आणि धोरणांची जनतेपर्यंत अंमलबजावणी झाली की नाही, सरकारी योजनांची प्रगती काय? मंत्रालयांमधील समन्वय आणि सामान्य नागरिकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचतात की नाही? याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
दोन दिवस चर्चा
ही बैठक सामान्यपणे होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपेक्षा वेगळी असणार आहे. मंत्र्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीसाठी अनेक ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यात शासन व्यवस्था, सुधारणा आणि सरकारी कामकाज अधिक प्रभावी बनवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
धोरणांच्या अंमलबजावणीवर फोकस
या बैठकीत धोरणं तयार करण्यापासून ती धोरणं लागू करण्याबाबतची चर्चा केली जाणार आहे. धोरणं तयार केल्यावर त्याचा जनतेवर काय परिणाम होतो, नागरिकांना त्याचा किती फायदा होतो, यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
महत्त्वाची बैठक
मोदी सरकारचा हा तिसरा कार्यकाळ आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विविध मंत्रालयांच्या कामकाजाची दिशा या निमित्ताने ठरवली जाणार आहे. तसेच शासन आणि धोरणं याची समीक्षाही या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला राजकीय हवा मिळाली आहे.
नंतर फेरबदल?
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून केंद्रात संभाव्य फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता 23-24 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर केंद्रात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही बैठक म्हणजे संभाव्य फेरबदालाची नांदी असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, अद्याप कोणत्याही केंद्रीय नेत्याने केंद्रीय कॅबिनेट विस्तारावर भाष्य केलेलं नाहीये.
फेरबदलाची चर्चा का?
कॅबिनेटच्या विस्ताराची आधीपासूनच चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. तसेच मित्र पक्षांनाही मंत्रिपदे हवी आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फेरबदलाची चर्चा जोर धरून आहे. नव्या फेरबदलात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे.