
एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो. मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. आतापर्यंत 112 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मा यांनी एकापेक्षा एक मोठ्या गुन्हेगारांना हाताळले आहे. एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक किस्से सांगितले. यावेळी त्यांनी दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकर याच्या अटकेचा किस्सा देखील सांगितला. इकबालला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तो अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पाहत होता.
प्रदीप शर्मा हे 2017 साली ठाणे नियुक्त होते. त्यावेळी ठाणे शहर आणि ठाणे ग्रामिण येथे खंडणीचे रॅकेट चालायचे. अनेकांकडून खंडणी उकळली जायची. हे खूप मोठे रॅकेट डी गँगकडून चालवले जायचे असे म्हटले जात होते. या रॅकेटचे धागेदोरे हे दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर याच्यापर्यंत जाऊन पोहोचत होते. त्यामुळे प्रदीप शर्मा यांनी इकबालला पकडण्याचा प्लान आखला होता. त्यावेळी इकबाल हा मुंबईत राहात होता आणि दाऊद हा पाकिस्तानात होता.
वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम
इकबाल कासकरला कसे पकडले?
मुलाखतीमध्ये इकबालला पकडण्याविषयी बोलताना एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणाले, दाऊदचा एक छोटा भाऊ इकबाल कासकर अजूनही मुंबईत राहतो. त्याला दुबईतून डिपोर्ट करण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर एका प्रकरणात त्याला अटक झाली. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर तो ठाण्यात खंडणीचा धंदा करत होता. त्याचवेळी माझी पोस्टिंग ठाण्यात झाली. या खंडणी रॅकेटचा मला सुगावा लागला तेव्हा आम्ही तपास सुरू केला आणि तपास इकबालपर्यंत पोहोचला. मग आम्ही नागपाड्यात गेलो. इकबाल आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. घराखाली त्याने 8-10 लोक ठेवले होते. तिथे पोलिसही कमी जायचे, पण कोणी गेला तर त्याला खबर दिली जायची.
अटक करण्यापूर्वी खाल्ली बिर्याणी
प्रदीप शर्मा यांनी एक चांगला डाव आखला. त्यांनी इकबालला खबरही न लागून देता अटक केली. पण ही अटक कशी केली हे ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल. प्रदीप शर्मा त्यांनी आखलेल्या प्लानविषयी बोलताना म्हणाले, मला ही गोष्ट कळली तेव्हा मी माझ्या 3-4 खासगी लोकांना 8-10 दिवस नजर ठेवायला सांगितले. शेवटी एक दिवस आम्ही गेलो आणि इकबालच्या माणसाला ताब्यात घेतले. त्याला कसेबसे सोबत घेऊन इकबालच्या दारात उभे राहिलो. दार बंद होते. त्यामुळे दार उघडण्यापूर्वी इकबाल की होलमधून पाहणार याचा अंदाज घेतला. त्यामुळे सोबत असलेल्या इकबालच्या माणसाला की होलसमोर उभे केले. दार वाजवल्यानंतर सर्वात आधी त्याने की होलमधून बाहेर पाहिले. त्याला आपला माणूस दिसला. त्यामुळे त्याने पटकन दार उघडले.
पुढे ते म्हणाले, आम्ही चालकीने मग पटकन आत गेलो. आम्ही आत गेलो तेव्हा इकबाल शालीमार रोडची बिर्याणी खात होता. सोबतच ‘कौन बनेगा करोडपती’ हा अमिताभ बच्चन यांचा शो पाहत होता. मी आत गेल्यावर त्याला म्हणालो, चला इकबाल भाई, तुमची वेळ आता संपली आहे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला म्हटले, मला बिर्याणी खाऊ द्या. मी त्याला लगेच म्हणालो, हो, खा. मग तो निवांतपणे अटक झाला आणि आम्ही त्याला ठाण्यात घेऊन आलो. ही 2017 ची गोष्ट आहे आणि आता 2025 आहे. तो अजूनही तुरुंगात आहे.
इकबाल समुद्रकिनारी जात नाही
प्रदीप शर्मा यांनी पुढे सांगितले की इकबाल हा समुद्रकिनारी जायला नेहमी घाबरायचा. त्याने मागचे कारण देखील चौकशीदरम्यान सांगितले होते आणि हे कारण मजेशीर होते. प्रदीप शर्मा याविषयी बोलताना म्हणाले की, चौकशीदरम्यान त्याने सांगितले होते की दाऊद पाकिस्तानातच आहे. अटक होण्यापूर्वी दाऊद दरमहा त्याला पैसे पाठवायचा. जेव्हा त्याला जास्त पैशांची गरज असायची, तेव्हा तो दाऊदच्या फोनवर बोलायचा नाही. हे दाखवण्यासाठी की मी नाराज आहे, म्हणून दाऊद त्याला मनवण्यासाठी जास्त पैसे द्यायचा. इकबाल कधीही समुद्रकिनाऱ्यावर जायचा नाही. चौकशीत त्याने सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे कारण असे आहे की, जर तो समुद्रकिनाऱ्यावर गेला तर दाऊद जहाज पाठवून त्याचे अपहरण करून पाकिस्तानला घेऊन जाईल आणि त्याला पाकिस्तानात जायचे नव्हते.”
राज ठाकरे यांचा कोकण दौरा का रद्द झाला होता?
प्रदीप शर्मा यांनी या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या हत्येचा प्लान देखील आखण्यात आला होता असे सांगितले. प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरे यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मी आणि माझा मित्र अविनाश धर्माधिकारी कांदिवली क्राइम ब्रांचमध्ये काम करत होतो. आम्ही काही नंबर्सवर काम करत होतो. अचानक त्यात राज ठाकरे यांचा नंबर आणि नाव येऊ लागलं. त्याबाबत चर्चा सुरू झाली. तेव्हा राज ठाकरे कदाचित कोकण दौऱ्यावर जाणार होते. आम्ही ही बाब आमच्या जॉइंट सीपी मीरा यांना सांगितली. त्यांनी पुढे सीपी एएन रॉय यांना ही माहिती दिली. मग राज ठाकरे यांना याबाबत सांगण्यात आले. याबाबत मी आता जास्त सांगू शकत नाही, पण मोठा धोका होता.
पुढे ते म्हणाले, धोका कोणाकडून होता, हेही मी सांगू शकत नाही. राज ठाकरे यांनाही याबाबत सांगण्यात आले नव्हते. त्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. असाच प्रकार नारायण राणे यांच्याबाबतही घडला होता. दाऊद टोळीकडून त्यांना नेहमीच धमक्या मिळायच्या. त्यांचा सुद्धा सिधुगर्ग किंवा असा काही दौरा होता, तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते की, जर तुम्ही दौरा पुढे ढकलू शकत असाल तर तो पुढे ढकला.”