सत्ता आल्यास काँग्रेस पक्ष प्रत्येक महिन्याला गृहिणींना 1000 रुपये देणार

| Updated on: Mar 30, 2021 | 9:05 AM

राज्यातील प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला 1000 रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन | Puducherry assembly Election 2021

सत्ता आल्यास काँग्रेस पक्ष प्रत्येक महिन्याला गृहिणींना 1000 रुपये देणार
Congress flag
Follow us on

पुदुच्चेरी: काँग्रेस पक्षाने नुकताच पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने (Congress) सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला 1000 रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मोफत कोव्हीड लसीकरण, नवे शिक्षण धोरण आणि शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणाही काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत. आता निवडणुकीत काँग्रेसला याचा फायदा मिळणार का, हे पाहावे लागेल. (Housewife will get 1000 rs every month)

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट (NEET) परीक्षा आणि नवे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचे आश्वासन पुदुच्चेरीच्या मतदारांना देण्यात आले आहे. तसेच कराईकलमध्ये कृषी विद्यापीठ आणि एक विधी विद्यापीठ स्थापन करु, असेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्यातील काँग्रसचे सरकार पडले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची परिस्थिती फारशी चांगली नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने योजनाबद्ध पावले टाकून, पुदुच्चेरीत काँग्रेसची ताकद कमी केली आहे. मतदानपूर्व एक्झिट पोल्समध्येही पुदुच्चेरीत काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तामिळनाडूतही द्रमुक सरकारचे गृहिणींना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी राज्यातील रेशनकार्डधारक कुटुंबातील गृहिणींना प्रतिमहिना 1000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आगामी दहा वर्षात तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करु. तसे झाल्यास राज्यातील दरडोई वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये इतके असेल. यामुळे जवळपास 1 कोटी लोक गरिबीतून मुक्त होतील, असा आशावाद एम.के. स्टॅलिन यांनी व्यक्त केला होता.

पुदुचेरीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं अवघड?

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांकडून पुदुचेरीची सत्ता मिळवण्यासाठी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करुन वेळोवेळी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरुन दूर केल्याने काँग्रेसच्या हातातील हुकमी मुद्दाच काढून घेतला आहे.

तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे राज्यपालपद देण्याचा मास्टरस्ट्रोक

किरण बेदी यांच्याकडून पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाची सूत्रे काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्याकडे सध्या तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारीही आहे. मात्र, त्यांच्यावर पुदुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देऊन भाजपने मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.

कारण तमिलसाई सुंदरराजन यांचे मूळगाव तामिळनाडूत आहे. पुदुचेरीतही तामिळ भाषिक मतदार आहेत. व्ही. नारायणस्वामी यांच्याप्रमाणे टी. सुंदरराजन यादेखील नाडर समाजाच्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या गोष्टी भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी ‘काँग्रेसमुक्त’; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?

(Housewife will get 1000 rs every month)