Congress President Election: काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात? ‘ही’ गोष्ट सोनिया गांधींनी सांगितली असेल तर वेगळी गोष्ट; रविवारी होणार अंतिम निर्णय

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष केले जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना पक्षाची सूत्रे हाती घेण्यास सांगितले असल्याचेही बोलले जात आहे.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात? ही गोष्ट सोनिया गांधींनी सांगितली असेल तर वेगळी गोष्ट; रविवारी होणार अंतिम निर्णय
| Updated on: Aug 25, 2022 | 6:51 AM

नवी दिल्लीः सध्या काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची (Congress President Election 2022) चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गांधी घरण्याच्या बाहेर जाणार की गांधी घराण्याकडेच राहणार ही चर्चा चालू असतानाच अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेस पक्षाला पुढील महिन्याच्या 20 तारखेपूर्वी नवीन अध्यक्षाची निवड करायची आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची ही मुदत जवळ आल्याने आता देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची कमान कोणाकडे जाणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राहुल गांधींना पक्षाध्यक्ष व्हायचे नसताना, पुढचा अध्यक्ष नेहरू-गांधी (Neharu-Gandhi) घराण्यातील नसल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. राहुल गांधी यांनी ही घोषणा केल्यानंतर प्रियंका गांधी यांचेही नाव कोणी सुचवू नका असंही त्यांनी स्पष्ट केले होते त्यामुळे अशा परिस्थितीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी अध्यक्ष होण्याची शक्यताही कमी आहे. या गोष्टीची चर्चा चालू असतानाच पक्षाच्या कार्यवाहक अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांना पक्षाची सूत्रे हाती घेण्याची विनंती केल्याचेही सांगण्यात येत आहे.

सोनिया गांधींना नाही तर मी नड्डांना भेटू का?

काँग्रेस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या चर्चेला उधाण आले असतानाच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सोनिया गांधींना भेटून काँग्रेस अध्यक्षपदाबाबत माहिती विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मी नेहमीच त्यांची भेट घेत असतो, त्यामुळे आताही त्यांचीच मी भेट घेणार मग त्यांची भेट होत नसेल तर मी काय नड्डा यांची भेट घेणार का असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला.

या बातम्या माध्यमांनीच पसरवल्या

माझ्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबतच्या बातम्या या माध्यमांनीच पसरवल्या असल्याचे सांगत त्यांनी सांगितले की, सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत माध्यमांना सांगितले असेल तर ती वेगळी बाब आहे. मात्र काँग्रेस कार्यकारिणीची 28 ऑगस्टला बैठक होत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक आता घ्यायची की नंतर हा निर्णय मात्र त्या बैठकीतच होईल असंही त्यांनी सांगितले.

नेतृत्त्वाबाबत आम्ही नशिबवान

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना सांगितले की, काँग्रेसचे अनेक सदस्य सोनिया गांधी यांच्याबरोबर अनेक पैलूंवर आम्ही चर्चा करत असतो. भारतातील निवडणुकांबद्दल, राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याबद्दल आणि ज्या लोकशाहीची हत्या केली जात आहे त्याबद्दलही चर्चा होते, मात्र याबाबर माध्यमांनी कोणतीही गोष्ट छापली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सोनिया गांधींबद्दल मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसमधील अनेक जण नशीबवान आहेत, कारण सोनिया गांधींसारख्या नेतृत्त्वाकडे काम करता येते, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक चांगली प्रतिमा आहे. मात्र माझ्याकडे पक्ष जे काम देईल ते मला करायला नक्कीच आवडेल असंही त्यांनी सांगितले.

बिहारमध्ये काँग्रेस महत्त्वाचा घटकपक्ष

बिहारच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, बिहारमध्ये महाआघाडीकडे जी आकडेवारी आहे, त्यानुसार त्यांना जिंकायचे होते, यामध्ये नितीश कुमार आणि आरजेडीच्या महाआघाडी सरकारमधील एक घटक पक्षांपैकी काँग्रेस हादेखील देखील एक महत्त्वाचा घटकपक्ष राहिली आहे.

सध्या सरकार पाडण्याचं युग

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराबद्दल भाष्य केले, त्यांनी सांगितले की, सध्या राजकीय चर्चा करणे योग्य नाही कारण सध्या सरकार पाडण्याचं हे युग आहे. त्यामुळे देशभर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचीच सर्वत्र चर्चा आहे. राजस्थानमध्ये 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी गुंतवणूकदारांचा मेळावा होत आहे. मेळाव्याशी संबंधित कार्यक्रमपानिमित्त माहिती देताना त्यांनी सांगिते की, राजस्थानमधील सोलार प्लांटमुळे आता चित्र बदलले आहे. यामुळे राजस्थानमध्ये सौर आणि पवन ऊर्जेमध्ये मोठी क्रांती होणार आहे. सध्या राजस्थानमध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदल होताना दिसत असल्याचेही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.

Follow Us