‘भुजिया किंग’चा प्रवास थांबला! कोट्यवधींचे साम्राज्य उभं करणाऱ्या शिवरतन अग्रवाल यांचे निधन
बीकाजी ग्रुपचे CMD शिवरतन अग्रवाल यांचे चेन्नईत निधन झाले. त्यांनी छोट्या व्यावसायातून सुरुवात करून आज हजारो कोटींची संपत्ती.

Shivratan Agarwal : शिवरतन अग्रवाल, बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांचे गुरुवारी सकाळी चेन्नई येथे निधन झाले. ते पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह चेन्नईत थांबले होते. सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात अपयश आले.
कौटुंबिक सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीची नुकतीच हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे अग्रवाल कुटुंब गेल्या सुमारे दहा दिवसांपासून चेन्नईत होते. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवरतन अग्रवाल यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
छोट्या व्यवसायातून जागतिक यशापर्यंतचा प्रवास
बिकाजी फूड्स इंटरनॅशनलची स्थापना शिवरतन अग्रवाल यांनी 1993 साली बीकानेर येथे केली. मात्र त्यांची व्यावसायिक वाटचाल त्यापूर्वीच सुरू झाली होती. पारंपरिक हल्दीराम व्यवसायापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला आणि ‘शिवदीप फूड्स प्रोडक्ट्स’ या नावाने भुजिया उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला.
भारतीय चवीला वेगळी ओळख मिळवून देण्याचा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन होता. याच विचारातून ‘बीकाजी’ हे ब्रँड नाव उदयास आले, जे बीकानेरचे संस्थापक राव बीका यांच्या नावावरून प्रेरित आहे.
जागतिक बाजारपेठेत ठसा
फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिवरतन अग्रवाल यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर मोठा उद्योग उभा केला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक देशांचा दौरा करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्या काळात भुजिया पूर्णपणे हाताने बनवली जात होती; मात्र त्यांनी मशीनद्वारे उत्पादनाची संकल्पना राबवली. यामुळे उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आणि गुणवत्तेतही सातत्य राखता आले. मशीनद्वारे भुजिया तयार करणारा देशातील पहिला ब्रँड म्हणून बीकाजीने वेगळी ओळख निर्माण केली.
आज बिकाजी फूड्स इंटरनॅशनल केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मजबूत उपस्थिती ठेवते. कंपनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि जागतिक मानकांनुसार प्रक्रिया यावर विशेष भर देते. शिवरतन अग्रवाल यांच्या निधनाने स्नॅक उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी केवळ यशस्वी उद्योग उभारला नाही तर भारतीय चवीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यातही मोलाचे योगदान दिले.