रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करा, केजरीवाल यांचे पंतप्रधानांना पत्र

कोरोनाकाळात रेल्वेप्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली प्रवास सवलत बंद करण्यात आली होती. ती अद्याप बहाल करण्यात आलेली नाही.

रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करा, केजरीवाल यांचे पंतप्रधानांना पत्र
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 03, 2023 | 12:07 PM

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणारी प्रवासी सवलत पुन्हा बहाल करण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळत असलेली सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना नाहक भुर्दंड बसत आहे. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. यावेळी केजरीवाल यांनी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी प्रवास सवलत पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना जवळपास पन्नास टक्के सवलत मिळत होती असे केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे. याचा लाभ देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना मिळत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेत सरकारने माहिती देताना सांगितले की रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत बंद केल्याने सरकारला दरवर्षी 1600 कोटीची बचत होत आहे. याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले आहे.

दिल्ली सरकारची ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा

एकीकडे केंद्र ज्येष्ठांची सवलत बंद करीत असताना आमचे दिल्ली सरकार ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवत आहे. आपल्या प्रगतीत वरिष्ठांचे आशीर्वाद पाठीशी असतात. त्यांच्या आशीवार्दाशिवाय कोणताही व्यक्ती, समाज आणि देश प्रगती करू शकत नाही. आम्ही दिल्लीत ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या आवडत्या तीर्थस्थळांची सैर घडवित आहोत. त्यामुळे ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत. ही बाब पैशाची नसून नितीमत्तेची आहे. दिल्ली सरकार आपल्या 70 हजार कोटीच्या बजेटमधून 50 कोटी जेष्ठांवर खर्च करीत असेल तर या खर्चाने दिल्ली सरकार काही गरीब होत नाही असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

रेल्वे प्रवासातील सवलतची रक्कम समुद्रातील थेंबा एवढी

येत्या काही वर्षात केंद्र सरकार 45 लाख कोटी खर्च करणार आहे, त्यात रेल्वे प्रवास सवलतीवरील 1600 कोटीची रक्कम समुद्रातील एक थेंबाप्रमाणे आहे. हा पैसा वाचवल्याने केंद्र सरकार श्रीमंत बनणार नाही. तसेच खर्च करूनही गरीब बनू शकत नाही. परंतू आपण हा निधी रोखून ज्येष्ठ नागरीकांना आम्हाला तुमची काळजी नाही हा चुकीचा संदेश देत आहोत. हे खूपच चुकीचे असून भारतीय संस्कृतीच्या विरूद्ध आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता दाखवून रेल्वेची प्रवास सवलत पुन्हा बहाल करावी अशी विनंती केजरीवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे.

Follow Us