Sanjay Raut : ही हुकूमशाही नाही, ही तर झोटिंगशाही; राहुल गांधी यांच्या चौकशीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut : ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, सुरू आहे. राजकीय विरोधकांना चिरडू शकतो हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे देशातील वातावरण दुषित झालं आहे.

Sanjay Raut : ही हुकूमशाही नाही, ही तर झोटिंगशाही; राहुल गांधी यांच्या चौकशीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा
ही हुकूमशाही नाही, ही तर झोटिंगशाही; राहुल गांधी यांच्या चौकशीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 10:32 AM

अयोध्या: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. आजही राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच कशाला? समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूलसह जे भाजपसोबत नाही त्यांना बडगा दाखवण्याचं काम सुरू आहे. याला राज्य करणं म्हणत नाही. ही एक प्रकारची झोटिंगशाही आहे. ही हुकूमशाही नाही. ही झोटिंगशाही आहे. झोटिंगशाही ही हुकूमशाहीच्या पुढची पायरी आहे, असं संजय राऊत म्हणाले. विरोधकांची एकजूट असो नको, विरोधकांना त्रासा दिला जात आहे. तपास यंत्रणाचा वार करून फूट पाडली जात आहे. बहुमत मिळवलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संजय राऊत हे कालपासून अयोध्येत आले आहेत. उद्या आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत अयोध्येत आले आहेत.

ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, सुरू आहे. राजकीय विरोधकांना चिरडू शकतो हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे देशातील वातावरण दुषित झालं आहे. विरोधकांशीही अदबीनंव वागावं ही आपली संस्कृती. नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत ही संस्कृती पाळली गेली. आज राजकारणातील सहिष्णूता नष्ट केली आहे. जाती जातीत द्वेष, धर्माधर्मात द्वेष पेरला जात आहे. राज्यकारभार सूडाने केला जात आहे, अशी टीका राऊत यांनी केली. राजकीय विरोधक कुणाला म्हणायचं? राजकीय विरोधकांना पूर्वी प्रतिष्ठा आणि लायकी होती. आता ऊठसूट टीका केली जाते. सोडून द्या, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे बैठकीला जाणार नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधकांची उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. आम्ही आधीच ठरलेल्या कार्यक्रमानुसार अयोध्येत आलो आहोत. पण आमचा एक प्रतिनिधी उद्याच्या बैठकीला उपस्थित असेल, असं त्यांनी सांगितलं.

शिवसैनिक 15 दिवसांपासून अयोध्येत दाखल

महाराष्ट्रातील विविध भागातील शिवसैनिक अयोध्येत आले आहेत. मी काल आलो. नाशिक, ठाणे. मुंबईतील शिवसैनिक 15 ते 20 दिवसांपासून शिवसैनिक अयोध्येत आहेत. लखनऊपासून होर्डिंग लावले आहेत. उद्या शिवसैनिक शरयूच्या आरतीची तयारी करताना दिसतील. कार्यक्रम छोटा आहे. पण महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे दोनदा अयोध्येत आले आहेत. यावेळी आदित्य यांचा हा दौरा स्वतंत्र आहे. बरेच दिवस अयोध्येत गेलो नव्हतो. त्यामुळे आम्ही नेते मंडळींचं अयोध्येत पूजा करायला जायचं ठरलं. ते आदित्य ठाकरेंना समजलं. तेव्हा ते म्हणाले, आपण सर्वच जाऊ. गेल्या दोन वर्षापासून आपण अयोध्येत गेलो नाही. अयोध्येत गेल्यावर नवी ऊर्जा मिळते. प्रेरणा मिळते. उद्याच्या दौऱ्यातून ऊर्जा मिळेल, असं राऊत म्हणाले.

हे हिंदुत्व नाही

हिंदुत्व म्हणजे काय आहे? आपण प्रभू रामाच्या भूमीत येतो. हिंदुत्वाचं प्रतिक म्हणून येतो. रामाने समन्वयचं राजकारण केलं. वनवास पत्करला. रावणाशी युद्ध केलं. हे त्यांचं हिंदुत्व नाही. आज जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांच्यावर बुलडोझर फिरवायचं, चौकशीला बोलावयचं छळ करायचं हे हिंदुत्व नाही. आज दुर्दैवाने संयम आणि अशा प्रकारचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

तेव्हा बाळासाहेब पुढे आले होते

रावण हे अंहकार आणि द्वेषाचं प्रतिक आहे. हेट स्पीच, हेट पॉलिटिक्स म्हणता त्याच नजरेतून आपण रावणाला पाहतो. कुणी काही म्हटलं तरी राम जन्मभूमीत शिवसेनेचा खारीचा वाटा आहे. रामायणात खारीचा वाटा मोठा आहे. हा खारीचा वाटा नसता तर राम सेतू बांधला झाला नसता. तर राम लंकेत गेले नसते आणि रावणाला मारले नसते. भाजपला प्रश्न उपस्थित करायला काय जातं. जेव्हा तिथे हातोडा मारणारं कोणी नव्हतं. तेव्हा आमच्या हातात हातोडा होता. जे हातोडा मारून पळून गेले. तेव्हा बाळासाहेब पुढे आले होते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us