Sanjay Raut : काश्मीरचं राजकारण करणं भाजपच्या रक्तातच, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे आहेत. ते चारही निवडून येतील. कोणीही अपक्ष नाराज नाही. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष नाराज आहेत. ते आम्हाला पाठिंबा देणार आहेत, असं म्हटलं तर तुम्ही मानाल का?

Sanjay Raut : काश्मीरचं राजकारण करणं भाजपच्या रक्तातच, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
काश्मीरचं राजकारण करणं भाजपच्या रक्तातच, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 12:05 PM

अयोध्या: काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची होत असलेली हत्या आणि सुरू असलेल्या पलायनावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दहशतवादी काश्मिरात हिंदू पंडितांना मारत आहेत. या हल्ल्यामुळे आतापर्यंत पाच हजार लोकांनी स्थलांतर केलं आहे. ही किरकोळ घटना आहे का? काश्मिरी पंडित काश्मीरमधून विस्थापित होत असतील आणि महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचं संरक्षण करू. त्यांना जी मदत हवी ती देऊ, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं. हीच गोष्ट भाजपच्या (bjp) नेत्यांनी सांगितली असती तर आम्हाला आनंद झाला असता, असं सांगतानाच काश्मीरचं राजकारण करणं हे भाजपच्या रक्तातच आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपर केला आहे. काश्मिरात आतापर्यंत 27 पंडित मारल्या गेले आहेत. मुस्लिम जवानही मारले गेले. त्यांचं योगदान आणि बलिदानही विसरता येणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार आघाडीवर नाराज आहेत का? असा सवाल करण्यात आला. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे आहेत. ते चारही निवडून येतील. कोणीही अपक्ष नाराज नाही. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष नाराज आहेत. ते आम्हाला पाठिंबा देणार आहेत, असं म्हटलं तर तुम्ही मानाल का? राजकारणात अशा गोष्टी होतात. 10 तारखेला चित्रं स्पष्ट होईल. तुमचे सर्व प्रश्न महाराष्ट्रातील आहेत. तिथलं राजकारण आम्ही सांभाळत आहोत. राज्यातील राजकारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नियंत्रण आहे. काही होणार नाही. 11 तारखेला निकाल लागेल. मी 12 तारखेला इथे येईल. तेव्हा मला विचारा, असं राऊत म्हणाले.

आमचे चारही उमेदवार निवडून येतील

यावेळी एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोविड संकटातही अपक्षांची कामे करण्याचं काम आम्ही केलं आहे. त्यामुळे अपक्ष नाराज असल्याच्या चर्चेत काहीच तथ्य नाही. सर्व अपक्ष आमच्यासोबत आहेत. आमचे चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा शिंदे यांनी केला.

कानपूरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय झालाय

कानपूरचं प्रकरण गंभीर आहे. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे. पैगंबाराबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचं समर्थन कोणी करणार नाही. भाजपला जगाची माफी मागावी लागत आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.