उद्धव ठाकरेंच्या सूचनेने गाझीपूर सीमेवर, संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार

| Updated on: Feb 02, 2021 | 8:41 AM

Sanjay Raut farmers Gazipur - शिवसेना संजय राऊत यांनी दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंच्या सूचनेने गाझीपूर सीमेवर, संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
संजय राऊत, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गाझीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यांसंबधी माहिती दिली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. (Sanjay Raut to visit protesting farmers at Gazipur Singhu Border)

“महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

किसान आंदोलन झिंदाबाद! असे म्हणत संजय राऊत यांनी दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांना भेटून शिवसेनेच्या भावना पोहोचवणार

आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना सांगितले होते. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.

‘चर्चा करताना शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार नको’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांशी चर्चा करतील तेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर काळ्या कृषी कायद्याची टांगती तलवार असता कामा नये. त्यामुळे हे कायदे रद्द करूनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे राऊत यांनी म्हटले.  शेतकरी हा काही राजकारणी नाही. तो त्याच्या भावी पिढ्यांसाठी लढतोय. हे शेतकरी कोणत्या प्रांताचे, धर्माचे किंवा जातीचे आहेत, हे महत्त्वाचे नाही. हा राष्ट्रीय लढा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

विरोधक म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे परत घ्या, मोदी म्हणाले…

‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या

(Sanjay Raut to visit protesting farmers at Gazipur Singhu Border)