लखनऊ: स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला असलेल्या शबनमसाठी (Shabnam) आता महंत परमहंस यांनी पुढाकार घेतला आहे. हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही. तसे झाल्यास तुम्ही दुर्दैवी आपत्तींना तोंड द्याल. शबनमचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. परंतु, एक स्त्री म्हणून तिची फाशीची शिक्षा मागे घेतली पाहिजे, असे महतं परमहंस यांनी सांगितले. ( Shabnam first indian women to be executed hang to death)
त्यांनी सोमवारी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शबनमच्या दया याचिकेचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शबनमने तुरुंगात राहून गुन्ह्याचे प्रायश्चित भोगले आहे. तिला फाशी देण्यात आली तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल. असे महंत परमहंस यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच शबनमच्या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची विनंती केली होती.
भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानला जाते. आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे.
2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. यामध्ये 10 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. शबनम हिने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता.
उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.
अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचे महिन्यांचे बाळ यांचा समावेश होता. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले.
सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले.
( Shabnam first indian women to be executed hang to death)