शेतकऱ्यांना चिरडणं ही तुमची पॉलिसी आहे काय?, संजय राऊत मोदी-योगींवर तुटून पडले

| Updated on: Oct 04, 2021 | 11:52 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट भाजपच्या वर्मी घाव घातला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजप आणि मोदींची पॉलिसी आहे का?, हे त्यांनी स्पष्ट करावं, अशा संतप्त भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांना चिरडणं ही तुमची पॉलिसी आहे काय?, संजय राऊत मोदी-योगींवर तुटून पडले
Sanjay Raut
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूरमध्ये 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. शेतकरी आंदोलनावेळी वाहन शिरल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या घटनेने देशभरात वातावरण तापलं आहे. भाजप सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट भाजपच्या वर्मी घाव घातला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजप आणि मोदींची पॉलिसी आहे का?, हे त्यांनी स्पष्ट करावं, अशा संतप्त भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

शेतकरी काय देशविरोधी कृत्य करत आहेत काय?

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर घटनेने देशात लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न पडतो. इथले शेतकरी काय देशविरोधी कृत्य करत आहेत काय? त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याची परवानगी नाही काय?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित करताना शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नका आणि जर घ्याल तर देशभरात काय होईल ते पाहा, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला.

शेतकऱ्यांविरोधात सरकारच्या मनामध्ये इतका द्वेष का?

शेतकऱ्यांविरोधात सरकारच्या मनामध्ये इतका द्वेष का?, ते कोणतं देशविघातक कृत्य करत आहेत. शेतकरी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत. देशाच्या लोकशाहीचं आपण जगभरात उदाहरण देतो. अशावेळी आपल्याच देशात काय चाललंय? उत्तर प्रदेशात आंदोलनांना चिरडण्याची नवा प्रथा सुरु झाली आहे. बरं विरोधकांना तिथे जाण्यापासून भाजप का रोखत आहे. अनेक नेत्यांना पीडित कुटुंबांशी बोलायचंय, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रियांका गांधींना रोखलं, दोन मुख्यमंत्र्यांना युपीत पाऊल ठेवण्यास बंदी घालण्यात आलीय, शेतकऱ्यांना चिरडण्याची भाजपने अधिकृत पॉलिसी स्वीकारली आहे का?, असा संतप्त सवाल राऊतांनी विचारला.

शेतकऱ्यांची पंगा घेऊ नका, घ्याल तर देशात काय होतंय ते बघा

शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नका आणि जर घ्यायचा असेल तर खुशाल घ्या, मग देशभरात काय होतंय ते ही पाहा, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही त्यांना ब्रिटीशांसारखी वागणूक देत आहात. मुंबईत बाबू गेनूने ब्रिटीशांविरोधात आंदोलन करताना ट्रकखाली झोपून आंदोलन केलं होतं. त्यावेळी ब्रिटीशांनी त्याच्या अंगावर ट्रक घातला. उत्तर प्रदेशमध्येही सध्या असाच प्रकार सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय.

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचं मूळ गाव बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेत चार शेतकरी आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी एका मोटारीत आशिष मिश्रा हा मंत्रीपुत्र होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.

(Shivsena Sanjay Raut Attacked BJP Modi Yogi Government over UP Lakhimpur Kheri)

हे ही वाचा :

प्रियांका गांधी नजरकैदेत, काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांना UP मध्ये पाऊल ठेवण्यास बंदी, योगी सरकारचं चाललंय काय?