शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

| Updated on: Dec 27, 2020 | 1:09 AM

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शनिवारी (26 डिसेंबर) शोपियां जिल्ह्यातील एका कथित ‘बनावट’ चकमकीप्रकरणी भारतीय सैन्याच्या एका कॅप्टनसह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय.

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश
Follow us on

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शनिवारी (26 डिसेंबर) शोपियां जिल्ह्यातील एका कथित ‘बनावट’ चकमकीप्रकरणी भारतीय सैन्याच्या एका कॅप्टनसह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां येथे झालेल्या एका कथित चकमकीत 3 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल झालंय. पोलिसांनी शोपियांच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलंय (Shopian fake encounter Indian Army captain among 3 named in chargesheet).

पोलीस उपाधीक्षक वजाहत हुसेन म्हणाले, “या प्रकरणातील आरोपींमध्ये 62 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन भूपिंदर, पुलवामा येथील रहिवासी बिलाल अहमद आणि शोपियां येथील रहिवासी ताबिश अहमद यांचा समावेश आहे.” हुसेन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत.

“चकमकीत मारण्यात आलेल्या मजुरांचा कोणत्याही दहशतवादी कृत्याशी संबंध नाही”

भारतीय सैन्याने म्हटलं होतं, “18 जुलै 2020 मध्ये अमशीपोरा (शोपियां) येथे झालेल्या चकमकीबाबत पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या चकमकीत 3 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कोणत्याही दहशतवादी घटनेशी कोणताही संबंध नव्हता. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी कायदा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे.”

मृत्यू झालेले 3 मजूर राजौरी जिल्ह्यातील रहिवासी

भारतीय सैन्याने 18 जुलै 2020 रोजी शोपियांच्या अमशीपोरामध्ये एका चकमकीत 3 अज्ञात दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर या मृतांचे फोटो आल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी या दाव्याचं खंडन केलं. तसेच आपल्या नातेवाईकांचा दहशतवाद्यांशी काहीही संबंध नसल्याचं सांगत ते शोपियांमध्ये मजुरी करत असल्याचं म्हटलं. हे तिघेही जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातील होते.

मृतांच्या डीएनए चाचणीत ते स्थानिक असल्याचं स्पष्ट

संबंधित मृतांच्या घरच्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या तिघांचीही पोलिसांनी डीएनए चाचणी केली. यात चकमकीत मारले गेलेले स्थानिक लोक असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, दुसरीकडे चकमक करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याने ते तिघेही परदेशी दहशतवादी असल्याचा आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्र झापडल्याचा दावा केला होता.

“आरोपींनी सैन्य अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला”

बनवाट चकमकीचा आरोप असलेल्या आरोपीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं सैन्याने मान्य केलंय. सैन्याने म्हटलं, “या चकमकीत सहभागी तिघांनीही आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला. त्यांनी सशस्त्र बल विशेष अधिकार अधिनियमाचा (अफ्सफा) गैरउपयोग केला. या बनावट चकमकीत मारले गेलेल्या तरुणांची नाव अबरार अहमद (25), मोहम्मद इबरार (16) आणि इम्तियाज अहमद (20) अशी आहेत. त्यांचे मृतदेह नंतर त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्यात आले होते.

हेही वाचा :

“जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा” आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान

ईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

माझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

Shopian fake encounter Indian Army captain among 3 named in chargesheet