प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, पालघरजवळ मर्सिडिजला झाला अपघात

| Updated on: Sep 04, 2022 | 5:56 PM

सायरस मिस्त्री हे अब्जाधीश असलेल्या पालनजी शापूरजी यांचे ते पुत्र होत. त्यांनी टाटा ग्रुपला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, पालघरजवळ मर्सिडिजला झाला अपघात
सायरस मिस्त्री
Follow us on

पालघर : (Tata Group) टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती (Cyrus Mistry) सायरस मिस्त्री यांचा (Accident) अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर-चारोटी परिसरातील सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. त्यांची मर्सिडिज डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली. या अपघातात मिस्त्री यांच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. चालकाचा ताबा सुटला आणि मर्सिडिज गाडी ही पूलावरील डिव्हायडरला धडकली. दरम्यान, मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.

चालकाचा ताबा सुटला अन् दुर्घटना घडली

सायरस मिस्त्री हे इतर दोघांबरोबर मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर प्रवास करीत होते. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ते पालघर येथील चारोटी परिसरातील सूर्या नदीवर पोहचले होते. मात्र, मर्सिडिज गाडी भरधावात असतानाच पूलावरील डिव्हायडरला धडकली. चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

चालकाचाही मृत्यू, दोघे जखमी

पालघर येथील चारोटीच्या नदी पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा तर मृत्यू झाला आहे. पण उपचारादरम्यान गाडीच्या चालकाचाही मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. इतर दोघे गंभीरित्या जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात भीषण असल्याने मर्सिडिज गाडीचाही चकणाचूर झाला आहे.

सायरस यांचे पार्थिव घराकडे मार्गस्थ

भीषण अपघातानंतर अवघ्या काही वेळात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त समोर आले. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करुन आता ते घराकडे मार्गस्थ कऱण्यात आले आहे. मात्र, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे उद्योग क्षेत्रात हळहळव व्यक्त केली जात आहे.

कोण होते सायरस मिस्त्री?

सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्तवाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली

सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य