
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या ७९ वर्षाच्या असून त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगा राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काल रात्री १२ नंतर सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा हे तातडीने रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या आपल्या आईसोबत रुग्णालयातच उपस्थित आहेत. त्या सध्या रुग्णालयातच असून डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत.
सोनिया गांधी यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जानेवारी २०२६ म्हणजेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांना छातीत संसर्ग आणि ब्रॉन्किअल अस्थमामुळे सहा दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. थंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे त्यांचा दमा बळावला होता. त्यापूर्वी जून २०२५ मध्ये पोटाच्या विकारांमुळे त्यांना चार दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रार्थना करत आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. लवकरच हेल्थ बुलेटिन जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. १९६८ मध्ये राजीव गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ राजकारणापासून अंतर राखले होते. मात्र, १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाच्या आग्रहाखातर १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिल्यानंतरही त्यांनी पंतप्रधानपद नाकारून डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केली होती. त्यांच्या या निर्णयाने भारतीय राजकारणात त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सध्या त्या राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत.