अंगावर काळे चट्टे पडतात अन् ओढावतो मृत्यू, मथुरेत ‘या’ गूढ रोगाची दहशत
Scrub Typhus | स्क्रब टायफस हा रोग सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात स्क्रब टायफस (Scrub Typhus) या रहस्यमयी रोगाची दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 12 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली आहे. हा अत्यंत घातक रोग असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून आता गावागावांमध्ये जाऊन लोकांची तपासणी सुरु झाली आहे.
तीन दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटी येथे एका कोविड सेंटरमधील लोकांना स्क्रब टायफसची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे कोविड सेंटर बंद करण्याची वेळ ओढावली होती. या सेंटरमध्ये तब्बल 29 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली होती. कोविड सेंटरमधील डॉक्टर्स आणि कर्मचारीही स्क्रब टायफसच्या तडाख्यातून सुटले नव्हते. परिणामी मथुरेत या रोगाचा आणखी वेगाने फैलाव होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
काय आहे स्क्रब टायफस?
स्क्रब टायफस हा रोग सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे.
स्क्रब टायफसची लक्षणे काय?
स्क्रब टायफसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा समावेश आहे. तसेच रोगाची लागण झाल्यास तुमच्या अंगावर काळे चट्टे उठतात. अनेकांच्या अंगावर सूज येण्याचीही शक्यता आहे.
स्क्रब टायफस या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रत्येक दिवशी 1 लाख रुग्ण सापडणार
देशात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर दररोज एक लाख नवे रुग्ण नोंदवले जातील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. त्यावेळी दररोज चार लाख नव्या रुग्णांची नोंद होत होती. दुसऱ्या लाटेत हजारो लोक मरण पावले तसेच कित्येक लाख कोरोना विषाणूने संक्रमित झाले.
जर नवीन उत्परिवर्तन झाले नाही तर सध्याची स्थिती कायम राहील. तसेच सप्टेंबरपर्यंत 50 टक्के अधिक संसर्गजन्य उत्परिवर्तन आढळले तर नवीन प्रकार उदयास येईल. तिसरी लाट नवीन पॅटर्नमधूनच येईल आणि अशावेळी नवीन प्रकरणे दररोज एक लाखापर्यंत वाढतील, अशी माहिती आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज
देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर