भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती, पाकिस्तानच्या मित्र राष्ट्राचं नौदल कराचीत दाखल

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती, पाकिस्तानच्या मित्र राष्ट्राचं नौदल कराचीत दाखल
| Updated on: May 04, 2025 | 7:49 PM

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे तुर्कीचं नौदल जहाज टीसीजी बुयुकाडा रविवारी कराची बंदरामध्ये दाखल झालं आहे, तुर्की नौदलाचं जहाज सद्भावना म्हणून काराचीमध्ये आल्याचं स्पष्टीकरण यावर पाकिस्तानच्या वतीनं देण्यात आलं आहे. मात्र पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आलं की, तुर्कीचं नौदल जहाज टीसीजी बुयुकादा कराची बंदरात पोहोचलं आहे. कराचीमध्ये तुर्कीच्या नौदलाचं जंगी स्वागत करण्यात आलं. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदलामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये युद्ध प्रशिक्षण, मदत, परस्पर सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत माहिती देताना पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, तुर्की नौदलाचं जहान पाकिस्तानमध्ये आलं आहे. हे एक चांगले संबंध, बंधूभाव आणि पक्की मैत्री यांचं एक चांगलं उदाहरण आहे. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदल यांच्यामध्ये यादरम्यान विविध विषयांवर चर्चा होईल. दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्याची ही एक संधी आहे.

पाकिस्तानचा जळफळाट

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. आयात-निर्यात बंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असून, त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

Follow Us