Arvind Kejriwal : आज केजरीवाल PM मोदींच्या निवासस्थानी धडकण्याच्या तयारीत, पण त्याआधीच दिल्ली पोलिसांनी दिला झटका
Arvind Kejriwal : भाजपने अरविंद केजरीवालांच्या या आंदोलनावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यात देशातील 1 नंबरचा अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा लागली आहे अशी टीका भाजपने केली.

देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्यावरुन काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल असंच करण्याच्या तयारीत आहेत. ते पीएम निवासस्थानापर्यंत मार्च काढणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज 4 ऑगस्टला दुपारी 12 च्या सुमारास ते पीएम निवासस्थानापर्यंत मार्च काढणार आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे E20 पेट्रोल विरोधात प्रदर्शन करणार आहेत. ते आपल्यासोबत 100 लोकांना घेऊन जाणार आहेत. त्यानंतर ते जनहित याचिका सोपवतील.
भारताने अमेरिकेकडून इथेनॉल खरेदीसाठी ट्रम्प समोर गुडघे टेकले आहेत असा केजरीवाल यांचा आरोप आहे. सरकार दबावाखाली E20 पेट्रोलला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सरकारकडून सातत्याने E20 पेट्रोलच्या वापरावर भर दिला जातोय, त्यातून काहीतरी छुपा अजेंडा दिसून येतोय. लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. केजरीवाल यांना मार्चची परवानगी दिली जाणार नाही असं दिल्ली पोलीस दलातील सूत्रांनी सांगितलं. असा कुठलाही मार्च रोखण्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
केजरीवालांच्या मागण्या काय?
“मागच्या महिन्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. E20 पेट्रोलशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. पण मला त्या पत्रावर काहीच उत्तर मिळालं नाही. आता मी स्वत: पीएम निवासस्थानी जाऊन जनतेने स्वाक्षरी केलेले अर्ज सोपवणार आहे” असं केजरीवाल म्हणाले. “पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल असे दोन्ही पर्याय मिळाले पाहिजेत. E20 पेट्रोलची किंमत अजून कमी करा” अशी मागणी त्यांनी केली.
अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा
दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी केजरीवालांच्या या आंदोलनावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यात देशातील 1 नंबरचा अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा लागली आहे अशी टीका मल्होत्रा यांनी केली. “काँग्रेसने जेव्हापासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, तेव्हापासून केजरीवाल यांना आपण मागे पडल्यासारखं वाटत आहे. विनापरवानगी धरणं, प्रदर्शन करणं आणि नंतर विक्टिम कार्ड खेळणं ही केजरीवालाची जुनी शैली आहे” अशी टीका त्यांनी केली.
