भाजपने पोलिसांच्या वेषात पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरे लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्यांवर भडकले
uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केला.

नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. देशासहित महाराष्ट्रातही आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठाकरे बंधूंनी या आंदोलनावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने पोलिसांच्या वेषात पाकिस्तानातून गुंड आणले का? असा सवाल ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘जंतर-मंतरवर असताना खासदार माझ्यासोबत होते. त्यावेळी एक व्यक्ती संजय राऊत यांना भेटला. हा व्यक्ती मध्यवयीन होता. त्याचा व्यवसाय नीट सुरू असताना नोटबंदीत उद्ध्वस्त झाला. मी राग व्यक्त करायला आलोय. लोकही हा राग व्यक्त करायला आलेय. कोर्टाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिल्लीत मला देखील काही मुली भेटल्या. त्यांनी कपडे फाडून मारल्याचे सांगितले. काठींवर गंजलेले खिळे होते. ते लावून मारले गेले. आंदोलकांची डोकी फोडली आहे, एक मुलगी अवस्वस्थ होती. कोर्टाला कबुतरांना पाहण्यासाठी वेळ आहे. परंतु कॉक्रोचकडे वेळ नाही’.
‘जंतर-मंतरवर साध्या वेषात गुंडाच्या हातात पोलिसांच्या लाठ्या होत्या. पोलिसांची नावे देखील नव्हती. त्यांनी आंदोलन मोडायाला पाकिस्तानातून भाजपने गुंड आणले का? हे गुंड निर्विकार पाहताहेत. बेसुमार लाठीमार करताहेत. गुंडागर्दी सुरू असताना कोणीही गप्प बसू नये. राग व्यक्त करण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलंय. सिद्धीविनायकला साकडे घालू. सरकारला सुबुद्धी दे. नाही तर देशावरील सरकारच्या नावाने आरिष्ट दूर कर, असे उद्धव ठाकरे यांनी केलं.
मोर्चावर ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे मोर्चावर म्हणाले, देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे. त्यांनी मोर्चात यावे. जंतरमंतरवर सर्वच धर्मीय आणि भाषिक होते. पंतप्रधानांनी मुलांना भेटलं पाहिजे. ढकल गाडी करू नये. आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलाय़. रविवारी शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस येत असतील तर येऊ द्या’.