‘जिवंत आहे तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी नाही’, ममता बॅनर्जींचं आव्हान

| Updated on: Feb 10, 2021 | 6:05 PM

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी देणार नाही', असं थेट आव्हान ममता बनर्जी यांनी भाजपला दिलं आहे.

जिवंत आहे तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी नाही, ममता बॅनर्जींचं आव्हान
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला जाहीर आव्हान दिलं आहे. भाजपला सत्ता देणं म्हणजे दंगलींना आमंत्रण देणं आहे. जर जनतेला दंगलीचं वातावरण हवं आहेत जरुर भाजपला निवडून द्या. पण ममता बॅनर्जींना कुणी हरवू शकत नाही. कारण ममतासोबत लोकांचं समर्थन आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी देणार नाही’, असं थेट आव्हान ममता बनर्जी यांनी भाजपला दिलं आहे. कोलकातामधील एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपवर जोरदार टीका केली.(Mamata Banerjee’s challenge to BJP)

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत आहे. पण तृणमूल काँग्रेसचं सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 5 हजार रुपये देत आहे. तसंच मोफत पीक विम्याचीही व्यवस्था केल्याचं ममता यांनी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते, ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक राहिलेले अनेक दिग्गज भाजपात दाखल झाले आहेत. अशावेळी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ममता बॅनर्जी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे

भ्रष्टाचाऱ्यांना विकत घेऊ शकता, निष्ठावंतांना नाही – ममता

भाजप तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जाणार नाहीत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी 3 फेब्रुवारीला एका सभेत केला होता. तृणमूल काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे ज्यांना आमच्या पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी तातडीने निघावे, असा इशाराही त्यांनी भाजपात प्रवेश करु इच्छिणाऱ्यांना दिला होता.

46 दिवसात 11 नेते बाहेर

दीपक हल्दर यांच्यामुळे टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या काही दिवसात 11 नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहेत. पुढील काळातही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे.

युवा मोर्चा अध्यक्षही भाजपमध्ये येणार?

टीएमसीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष हिरेन चॅटर्जी हे सुद्धा भाजपमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना हिरेन चॅटर्जी यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. टीएमसीने केवळ आपला वापर केलाय, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदी पुन्हा पश्चिम बंगाल दौऱ्यावर, ममता बॅनर्जी ही उपस्थित राहणार, यावेळी काय घडणार?

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

Mamata Banerjee’s challenge to BJP