West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक

| Updated on: Mar 15, 2021 | 5:25 PM

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात काही गुन्हे लपवल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे.

West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात काही गुन्हे लपवल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे.(BJP alleges Mamata Banerjee did not disclose 6 offenses in affidavit)

ममता यांची उमेदवारी रद्द करा- अधिकारी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. प्रचारादरम्यान झालेल्या अपघातानंतर थेट व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशावेळी नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केलाय. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रावर त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला नसल्याचं अधिकारी यांनी म्हटलंय. तसंच ममता यांनी उमेदवारी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शुवेंदु अधिकारी यांचं निवडणूक आयोगाला पत्र

शुवेंदु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ममता बॅनर्जींवर गुन्हे लपवल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 6 गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. त्यातील 5 आसाममध्ये तर 1 सीबीआयच्या अधीन आहे. मात्र त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जर एखादा उमेदवार त्याच्याविरोधातील गुन्हे लपवत असेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. या आधारावर ममता यांची उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.

‘जखमी वाघिण जास्त घातक असते’

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान जखमी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. व्हीलचेअरवर बसून त्यांनी आज प्रचार रॅलीत सहभाग घेतला. इतकच नाही तर जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात विरोधी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पण हा हल्ला नाही तर अपघात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. यावेळीच ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

जमखी अवस्थेतही ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. एका व्हीलचेअरवर बसून त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या ममता जनतेला हात जोडून अभिवादन करत होत्या. पश्चिम बंगालमध्ये 14 मार्च रोजी नंदीग्राम दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मायो रोड ते हादरा मोड अशी 5 किलोमीटरची रॅली तृणमूल काँग्रेसकडून काढण्यात आली.

संबंधित बातम्या :

Special report : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?

West Bengal Election 2021 : ‘जखमी वाघिण जास्त घातक असते’, व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींची डरकाळी!

BJP alleges Mamata Banerjee did not disclose 6 offenses in affidavit