
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यासारख्या बागायती शेतीच्या पट्ट्यात तर बिबट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. काम करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर देखील बिबट्याने अनेकदा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरासमोर खेळत असलेली लहान मुलं देखील बिबट्याने उचलून नेली आहेत. राज्यात बिबट्यांची संख्या वाढल्यानं या बिबट्यांना आवर घालण्याचं मोठं आव्हान सध्या वनविभागासमोर आहे. एका रिपोर्टनुसार राज्याच्या ज्या भागांमध्ये उसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या देखील अधिक असल्याचं समोर आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात बिबट्याला लपण्यासाठी उसाची शेती आहे, सोबत उसाला जास्त पाणी लागत असल्यामुळे पाण्याची देखील सहज सोय होते. त्याचबरोबर गावातील भटकी कुत्री शिकारीसाठी सहज मिळत असल्यामुळे बिबट्यांना शिकारीसाठी देखील फार कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
बिबट्याबद्दल बोलायचं झालं तर बिबट्या हा अत्यंत चपळ असा प्राणी आहे, तो एक चालाख शिकारी आहे. तो वेगाने झाडावर देखील चढू शकतो. बिबट्या हा आपल्यापेक्षा लहान प्राण्यांवर हल्ला करतो. तसेच ही शिकार आपल्या आवाक्यामध्ये आहे, याची खात्री पटताच तो त्या प्राण्यांवर हल्ला करतो. त्यामुळेच अनेकदा शिकार समजून बिबट्या लहान मुलांवर देखील हल्ला करतो. बिबट्या कुठेही दिसल्यास बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खाली वाकू नका, तुम्ही जर खाली वाकले तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढते, या उलट तुम्ही खाली न वाकता आरडा -ओरड करत बिबट्यापासून सुरक्षित अतंरावर मागे -मागे सरकलात तर तुमचा बिबट्यापासून बचाव होऊ शकतो.
बिबट्याची आवडती शिकार कोणती?
बिबट्या अनेकदा गावांमध्ये भटक्या कुंत्र्यांवर हल्ला करताना दिसतो. मात्र ही त्याची नैसर्गिक शिकार नाहीये, तर बिबट्याची सर्वाधिक आवडती शिकार म्हणजे हरीण आणि सांबर या सारखे प्राणी आहेत. हरीण बिबट्याच्या शिकारीच्या टप्प्यात असल्यामुळे जास्तीत जास्त हरणाची शिकार तो करतो. सोबत कधी-कधी तो रानडुक्कर आणि माकडांची देखील शिकार करतो. मात्र सहसा तो हरणांचीच जास्त शिकार करतो.