
नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : मेजर नवनीत वत्स यांनी 20 वर्षांपूर्वी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यावेळी त्यांनी विचारही केला नव्हता की आपली मुलगी आपला वारसा पुढे नेईल. कारण त्यावेळी तिचे वय अवघे 3 वर्ष होते. मात्र, त्याच तीन वर्षाचा मुलीने वडिलांप्रमाणेच सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत घेऊन ती भारतीय लष्करात रुजू झाली. पण, याचवेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. सैन्यात भरती होताना त्या मुलीने वडिलांचा गणवेश परिधान केला होता. वडिलांच्या हौतात्म्यानंतर सुमारे 20 वर्षांनी लेफ्टनंट इनायत वत्स सैन्यात दाखल झाल्या आहेत.
दिल्लीतील पदवीधर आणि हरियाणाची रहिवासी असलेल्या इनायत वत्स या शनिवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या. इनायत तीन वर्षांच्या असताना त्यांचे वडील मेजर नवनीत वत्स एका दहशतवादी कारवाईत शहीद झाले. वडिलांच्या आठवणीत त्यांनी एक एक दिवस काढला. लहानपणीच त्यांनी वडिलांसारखेच सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कठोर मेहनत आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळविला.
लेफ्टनंट इनायत वत्स यांचे वडील मेजर नवनीत वत्स यांना 2003 मध्ये प्राण गमवावे लागले. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग होता. इनायत ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी सैन्यात आहे. इनायत यांचे आजोबाही सैन्यात कर्नल पदावर होते. नवनीत वत्स यांनी ऑपरेशन दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर सेना पदक प्रदान करण्यात आले आहे.
इनायत वत्स या दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजच्या पदवीधर आहेत. तर, हिंदू कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इनायत वत्स या भारतीय लष्करात भरती होण्याचा खास प्रसंगी त्यांनी वडिलांचा गणवेश परिधान करून आल्या होत्या. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्या चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये (OTA) गेल्या होत्या. हरियाणा सरकारने शहीद कुटुंबाबाबतच्या धोरणानुसार त्यांना राजपत्रित पदाची ऑफर दिली होती. मात्र तिने ती नाकारली.
वडील नवनीत वत्स यांना आदर्श मानणाऱ्या इनायतचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते आणि तिने ते साध्य केले. आई शिवानी यांनी मुलीच्या निर्णयाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, ‘ती एका धाडसी माणसाची मुलगी आहे. इनायतने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर राज्य सरकारने दिलेल्या नोकरीत रुजू होईल असे वाटत होते. मात्र, तिने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.’
शिवानी 27 वर्षांच्या असताना पती शहीद झाले. त्यावेळी लग्नाला फक्त चार वर्ष झाली होती. चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. एकदा इनायतने त्यांना विचारले, ‘मी मुलगा असते तर तू काय केले असते?’ त्यावेळी सांगितले होते की, त्याला एनडीए किंवा आयएमएमध्ये सामील होण्यास सांगितले असते. आज माझ्या मुलीने तेच केले याचा आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.