वय 55 पण लग्न नाही… ममता बॅनर्जी यांना हरवणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण?
Who is Suvendu Adhikari : भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना भवानीपूर या मतदारसंघात 15 हजार मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी कोण आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. यात पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. ममता बॅनर्जी यांना भवानीपूर या मतदारसंघातून भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 15 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले आहे. त्यामुळे अधिकारी यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सुवेंदू अधिकारी कोण आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
सुवेंदु अधिकारी यांचा राजकीय प्रवास
सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे झाला. राजकीय वातावरणात वाढ झाल्यामुळे त्यांनी लहान वयातच राजकारणात रस दाखवला. त्यांनी विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला.
TMC मध्ये असताना त्यांनी जलद गतीने आपली ओळख निर्माण केली आणि 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार बनले. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि 2016 मध्ये नंदीग्राम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2007 मधील नंदीग्राम आंदोलन यामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. हे आंदोलन जमीन अधिग्रहणाविरोधात होते आणि राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरले.
डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी TMC सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ममता बॅनर्जी यांना कडवी टक्कर देत पराभूत केले, ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. आताही त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे.
सुवेंदु अधिकारी यांनी लग्न का केले नाही?
सुवेंदु अधिकारी यांनी एकदा स्वतः सांगितले होते की त्यांनी लग्न का केले नाही. अधिकारी यांनी सांगितले होते की, त्यांच्या भागातील तीन प्रमुख स्वातंत्र्यसैनिक सतीश सामंत, सुशील धारा आणि अजय मुखर्जी यांचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला. या तिघांनीही अविवाहित राहून समाज आणि देशसेवा केली. त्यामुळेच सुवेंदु अधिकारी यांनीही अविवाहित राहून स्वतःला पूर्णपणे जनसेवेसाठी वाहून घेतले.
कुटुंबात कोण आहे?
सुवेंदु अधिकारी यांचे कुटुंब पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रभावशाली मानले जाते. त्यांचे वडील शिशिर कुमार अधिकारी दीर्घकाळ सक्रिय होते आणि केंद्रात मंत्रीपदही भूषवले आहे. त्यांचे भाऊ दिब्येंदु अधिकारी आणि सौमेंदु अधिकारी हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.