Congress: 11 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची कसोटी लागणार, ‘चिंतना’नंतर राजकीय ‘चिंता’मुक्ती मिळणार?

| Updated on: May 17, 2022 | 12:01 PM

Congress: 2024च्या लोकसभा निवडणुकी आधी 11 राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Congress: 11 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची कसोटी लागणार, चिंतनानंतर राजकीय चिंतामुक्ती मिळणार?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राजस्थानच्या उदयपूर येथे काँग्रेसचं (congress) नवसंकल्प चिंतन शिबीर (nav sankalp shivir) पार पडलं. 2024च्या निवडणुकीत काँग्रेसला मजबूत करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेसने तीन दिवसाचं चिंतन शिबीर घेतलं असलं तरी काँग्रेसची खरी कसोटी देशातील 11 राज्यांच्या आगामी निवडणुकीत (election) लागणार आहे. या निवडणुकीतून काँग्रेसची राजकीय चिंतामुक्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या 11 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं किंवा या राज्यात सत्ता वापसी झाल्यास काँग्रेसचा दिल्लीचे तख्त राखण्याचा मार्गही सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेस कशा प्रकारची रणनिती आखते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

2024च्या लोकसभा निवडणुकी आधी 11 राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2023मध्ये त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुका होत आहेत. 2023च्या फेब्रुवारीत या निवडणुका होतील. त्यानंतर मेमध्ये कर्नाटकात निवडणुका होतील. त्याशिवाय 2023च्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठ नेत्यांचा मोलाचा सल्ला

काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकांवर अधिक फोकस करण्यात आला. काँग्रेसच्या जवळपास सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर फोकस करण्यास सांगितलं आहे.

 

तर लोकसभा जिंकणं मुश्किल

काँग्रेसने गुजरात आणि हिमाचल प्रदेश जिंकले नाही तर 2024ची लोकसभा निवडणूक जिंकणे कठीण होईल, असं गुजरात काँग्रेसचे प्रभारी डॉ. रघू शर्मा यांनी या चिंतन शिबीरात स्पष्टपणे सांगितलं. सर्वांनी या दोन राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी एकजूट झालं पाहिजे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्यायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप सत्ताविरोधी लाट रोखणार?

11 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणं स्वाभाविक असणार आहे. त्यामुळे या अकरा राज्यातील निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट असल्याचं सांगितलं जात आहे. पाचा राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच भाजपने या अकरा राज्यात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच भाजपने आता गुजरात नंतर त्रिपुराचे मुख्यमंत्रीही बदलले आहे. सत्ताविरोधी लाट रोखण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचं सांगितलं जात आहे.