BLOG : धनंजय की पंकजा? गोपीनाथरावांनी धर्मसंकट कसं सोडवलं?

| Updated on: Dec 12, 2020 | 3:10 PM

परळीच्या विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. (Dhananjay Munde VS Pankaja Munde Assembly Election Candidate Suspense)  

BLOG : धनंजय की पंकजा? गोपीनाथरावांनी धर्मसंकट कसं सोडवलं?
Follow us on

गोपीनाथ मुंडे आता लोकसभा निवडणुक लढणार हे जववळपास नक्की झाले होते. मतदारसंघाची पुनर्ररचना झालेली होती. मुंडेचा परंपरागत मतदारसंघ रेणापूर आता लातूर ग्रामीण मध्ये मिसळला होता. तर  परळी आणि अंबाजोगाई तालुक्याचा भाग परळी या नावाने नव्याने निर्माण झाला होता. आता मुंडेनी आपला मतदारसंघ सोडल्यावर परळीच्या विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. (Dhananjay Munde VS Pankaja Munde Assembly Election Candidate Suspense)

धनंजय मुंडे त्याकाळात उमेदवारी आपलीच असा दावा करत होते.त्यांची निवडणुक लढविण्याची तयारी देखील पूर्ण झाली होती. लोकसभा निवडणुक आधी आणि त्यानंतर सहा महिण्यात विधानसभा निवडणुक होणार होती. या निवडणुकीच्या काळात मी तिथे एका वृत्तवाहिनीसाठी काम करत होतो. जवळपास सगळीच माध्यमे त्यावेळी धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार अशाच टोनने बातम्या चालवत होते. ही निवडणुक आपल्यालाच लढवावी लागणार अशा अर्थाने सगळी तयारी करत होते.

त्यावेळी म्हणजे अकरा वर्षापूर्वी डिजीटल पोलचिट छापून ठेवल्या होत्या. प्रचाराच्या साहित्याचे डिझाईन तयार होते. आवश्यक ती सगळी कर्ज फेडून बेबाकी प्रमाणपत्र जमा करण्यात आली होती. सरकारी देणी शिल्लक ठेवली नव्हती. सगळी सरकारी देणी जशी आयकर, विक्रीकर अशी क्लीयर केली गेली होती.

धनंजय मुंडे यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नाचे सरळ उत्तर गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळत नव्हते. पण स्पष्टपणे हो असे देखील ते कधी म्हणत नव्हते. पत्रकार म्हणून ही गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती. पण असा प्रश्न विचारणे म्हणजे रोष ओढावून घेणे असाच प्रकार होता.

धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा तेव्हा “माझे अप्पांशी (गोपीनाथ मुंडे) यांच्याशी स्पष्ट बोलणे झाले आहे उमेदवारी मलाच” असे स्पष्ट सांगत होते. आता मुंडेंच्या मनात काय चालले आहे हे समजून घेणे आवश्यक होते.

2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गेवराई तालुक्यातील तलवडा येथून होणार होता. या प्रचारसभेला त्याआधीचे खासदार जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी सोडून गोपीनाथराव या आपल्या जुन्या मित्राला पाठींबा द्यायला आले होते. या दिवसाचा संपूर्ण कार्यकृम कव्हर करण्याची सूचना मला वृत्तवाहिनीच्या मुख्यालयातून देण्यात आली होती. मी मुंडेना तसे सांगितले. त्यांनी दिवसभर मी आणि कॅमेरामन गाडीत असतील असे सांगितले. बीड येथील नारायण शिंदे यांच्या घरातून मी त्यांच्या गाडीत बसलो. सोबत अर्थात जयसिंगराव गायकवाड देखील होतेच.

त्यांचे फोनमध्येच होणारे स्वागत यातून वेळ मिळताच ते बोलायचे. वेळ थोडाच असायचा पण नेमका मुद्दा बोलून व्हायचा.

तलवड्याची सभा संपून पुढचा कार्यक्रम पाटोदा तालुक्यातील थेरला या गावी. भगवानगडाचा नारळी सप्ताह होता. तिथे उपस्थिती होती. हा प्रवास जरा मोठा होता. म्हणजे साधारण 45 मिनिटांचा. मध्ये कुठे स्वागत नव्हते. मी सरळ मुद्द्याला हात घातला.

“साहेब, परळीच्या उमेदवारीचे काय कोण असेल उमेदवार?” एकही क्षण न थांबता त्यांनी प्रतीप्रश्न केला. तुला काय वाटते कोण असले पाहिजे? आता माझ्याकडे उत्तर नव्हते. मी गप्प होतो. काही क्षण गप्प राहिलो अन मी बोललो पण तयारी तर जोरदार सुरू आहे. ते म्हणाले.. धनंजयला द्यायला हरकत नाही पण तो निर्णय घेताना मी विचार करतोय.. तू एक काम कर पंकजाताई उमेदवार कशा राहतील याचा विचार कर. जरा बातमी चालवून बघ प्रतिक्रिया काय येतील ते बघू.. मला साधारण अंदाज आला होता. पुढे मग निवडणुकीच्या अंगाने चर्चा झाली.

मी हा विषय वाहिनीतील मुंबईस्थित लोकांच्या कानी घातला. ही एक बातमी होती. गोपीनाथ मुंडे यांच्या मनात धनंजय मुंडे यांच्या व्यतिरिक्त पंकजा हे नाव देखील आहे. मग त्यानंतर उमेदवारी नेमकी कोणाला याच्या बातम्या सुरू झाल्या. यामुळे धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक माझ्यावर नाराज देखील झाले. परळीतील नाराजीचा अंदाज ज्याच्यावर ती ओढावली आहे, त्यालाच असतो.

बऱ्य़ाच बातम्या झाल्या आणि आम्ही ठामपणे सांगत होतो. उमेदवारी पंकजा मुंडे यांनाच मिळणार. झालेही तसेच. औरंगाबाद मध्ये पंडीतअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात बैठक झाली. त्यात पंकजा यांना उमेदवारी द्यायची आणि त्याची घोषणा बीडला पत्रकार परिषद घेऊन पंडीतअण्णा यांनी करायची असे ठरले. या सगळ्या प्रकाराचे वार्तांकन मी करतच होतो. कधी गोपीनाथ मुंडे तर कधी धनंजय मुंडे माझ्यावर नाराज होत होते.

या सगळ्या प्रकारात गोपीनाथ मुंडे यांचा कल मला समजल्यामुळे मी एकटाच उमेदवारी पंकजा मुंडे यांना अशी बातमी करत होतो. बाकी सगळेच धनंजय मुंडे यांचे नाव पुढे करत होते. त्यावेळी अनेकांचा गैरसमज असा झाला होता की मीच मुंडेंच्या मनात काही बाही भरवून देतो आहे. पण तसे नव्हते.

अण्णा पत्रकार परिषदेच्या दिवशी माझ्यावर चिडतील असे वाटले होते. पण तसे घडले नाही. त्याचा कांही दोष नाही त्याला वरून प्रेशर होते म्हणून त्यांनी मला माफ केलं…(Dhananjay Munde VS Pankaja Munde Assembly Election Candidate Suspense)

टीप – ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत