2 पिढ्या झाल्या, ना विखार संपला, ना वैर थांबलं, राणे vs ठाकरे संघर्ष टोकाला

राणे-ठाकरे कुटुंबातल्या वैराची सल, ही पिढी दर पिढी कमी होण्याऐवजी ती पुढच्या पिढ्यांमध्येही झिरपत चाललीय. राणेंचा राजकीय इतिहास बघितला, तर त्यांचं नाव हे नेहमी बंडानं चर्चेनं राहिलंय. मात्र जेव्हापासून राणे भाजपवासी झालेत, तेव्हापासून ते बंडाऐवजी वारंवार विधानांनी चर्चेत आणि वादातही आलेत.

2 पिढ्या झाल्या, ना विखार संपला, ना वैर थांबलं, राणे vs ठाकरे संघर्ष टोकाला
नारायण राणे यांना कणकवली पोलिसांची नोटीस
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 11:18 PM

याआधी थोरल्या राणेंना, थोरले ठाकरे नडले. आणि यावेळी धाकट्या ठाकरेंना, धाकट्या राणेंनी डिवचलं. थोरल्या ठाकरेंवर बोलताना थोरल्या राणेंकडून आक्षेपार्ह विधान निघालं आणि त्याच विधानावरुन त्यांना अटक झाली. आणि यावेळी धाकट्या ठाकरेंना बघून धाकट्या राणेंनी मांजरीचा आवाज काढला आणि एका मारहाणीचा प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले. राणे-ठाकरे कुटुंबातल्या वैराची सल, ही पिढी दर पिढी कमी होण्याऐवजी ती पुढच्या पिढ्यांमध्येही झिरपत चाललीय. राणेंचा राजकीय इतिहास बघितला, तर त्यांचं नाव हे नेहमी बंडानं चर्चेनं राहिलंय. मात्र जेव्हापासून राणे भाजपवासी झालेत, तेव्हापासून ते बंडाऐवजी वारंवार विधानांनी चर्चेत आणि वादातही आलेत.

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष टोकाला

याआधी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करुन नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला.त्यानंतर नितेश राणेंनी मांजरीचा आवाज काढल्यामुळे अधिवेशनात गदारोळ झाला आणि मारहाणीच्या प्रकरणावर बोलताना नारायण राणेंनी केलेल्या एका विधानानं मुलाबरोबर ते स्वतःही अडचणीत आल्याचं बोललं जातंय. नितेश राणेंवरच्या कारवाईचं कारण भलेही सिंधुदुर्गातल्या एका मारहाणीचं प्रकरण असो. मात्र राणे-ठाकरेंमधल्या वादाची जखम ही राजकारणाऐवजी वैयक्तिक वादानं पिचत चाललीय. दोघांमध्ये सुरुवात कुणीही करो., मात्र दोघांपैकी कुणीच कुणाचा शाब्दिक वार उधार ठेवत नाही. एकीकडून जितक्या प्रखरतेनं वार होतो, तितक्याच विखारीपणानं दुसऱ्याबाजूनं त्याचा प्रतिकार होतो. या शब्दांच्या विखारी युद्धात राणेंना भाजपचंही समर्थन हे अटी-शर्तींसह मिळतं. म्हणजे भाजप नेते राणेंच्या विधानाचं कधीच थेट समर्थन करत नाहीत. पण त्या विधानांवरुन होणाऱ्या कारवाईवर आवर्जून बोट ठेवतात. जसं राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल जे शब्द वापरले होते, त्याचं समर्थन भाजपनं केलं नाही. पण त्यावरुन झालेल्या अटकेच्या कारवाईचा भाजपनं मात्र निषेध नोंदवला आणि यावेळी मांजरीचा आवाज काढणाऱ्या नितेश राणेचंही समर्थन भाजपनं केलेलं नाही. पण, त्या विधानावरुनच सरकार सुडानं वागत असल्याचा दावाही भाजप करतंय.

म्याऊ म्याऊचा डाव भाजपवरच पलटला

नितेश राणेंच्या म्याव-म्यावमुळे यंदाच्या अधिवेशनात भाजप पहिल्या दिवशी ज्या फ्रँटफूटवर होती, दुसऱ्या दिवशी त्याच विधानामुळे बॅकफूटवर गेली… म्हणजे पहिल्या दिवसापर्यंत अधिवेशनावरचा होल्ड विरोधकांकडे होता. विरोधकांनी सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केली. मात्र दुसऱ्याच दिवशी विरोधकांचा हा घेरा नितेश राणेंच्या एका म्याव-म्यावनं त्यांच्यावरच उलटला.कारण, ज्या भास्कर जाधवांनी केलेल्या नक्कलेवरुन विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. नक्कलेबाबत माफी आणि सरकारला स्पष्टीकरण द्यायला भाग पाडलं, त्याच विरोधकांवर नंतर नितेश राणेंच्या म्याव-म्यावमुळे स्पष्टीकरण देण्याची वेळ ओढावली.

मारहाणीच्या तपासाचे तार कुठपर्यंत?

एका मारहाणीच्या तपासाचे तार कुठपर्यंत पोहोचले आहेत, त्याची पाळंमुळं खणून काढण्याचा अधिकार पूर्णपणे पोलिसांनाच आहे. पण, कारवाईसाठी इतकी कुमक आणि तत्परता अनेकांच्या भुवया उंचावतेय. मात्र तूर्तास एका विधानाचा वाद मिटत नाही, तोच राणेंनी दुसरं एक विधान करुन आयतं कोलित दिलंय. मात्र या सर्व घटनांमुळे एक गोष्ट पक्की होत चाललीय. ती म्हणजे कोणत्याही दोन कुटुंबातल्या शत्रुत्वाची धार ही पिढीनुसार प्रगल्भ आणि बोथट होत जाते. पण, राणे-ठाकरे कुटुंब त्याला अपवाद आहे. इथं वैरत्वाचा विस्तव थंडावण्याऐवजी तावून सुलाखून निघतोय. शत्रुत्वाची धार बोथट होण्याऐवजी दोन्हीबाजूनं ती धार रोज परजून निघतेय.

Navi Mumbai: नवी मुंबईत ओमिक्रॉनचा धोका वाढतोय, सरकारकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त

IPS Ankita Sharma | अभिनेत्री रवीना टंडणने का केलं IPS अंकिता शर्माचं कौतुक?

Jitendra Awhad | कालिचरण महाराजाविरोधात गुन्हा नोंदवला : जितेंद्र आव्हाड

Follow Us