tv9 Marathi Special : ‘सापळ्या’वर मनसेतच मतभेद? राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांकडे बोट तर मनसे प्रवक्त्यांच्या टार्गेटवर मात्र पवार, विषय तसा हार्डच, समजून घ्या !

| Updated on: May 24, 2022 | 5:21 PM

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांनी ऑन कॅमेरा राज ठाकरेंच्या विरोधात जे काही चाललंय ते त्यांच्या पक्षाच्या सांगण्यावरूनच करत असल्याचं मान्य केलंय. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी कितीही शरद पवारांवर आरोप केले तरी सापळा भाजपकडून तो सहजासहजी पवारांकडे सध्या तरी सरकताना दिसत नाहीय.

tv9 Marathi Special : सापळ्यावर मनसेतच मतभेद? राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांकडे बोट तर मनसे प्रवक्त्यांच्या टार्गेटवर मात्र पवार, विषय तसा हार्डच, समजून घ्या !
बृजभूषण आणि मनसे प्रवक्ते यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आलंय
Image Credit source: tv9
Follow us on

राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) विरोधात सापळा कुणी रचला आणि भाजपचे खासदार बृजभूषणसिंह (Brij Bhushan Singh) यांना रसद कुणी पुरवली यावर मनसेतच मतभेद असल्याचं दिसतंय. कारण पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी भाजपावर संशय व्यक्त करणारी वक्तव्य केली होती तर आज मात्र मनसेच्या प्रवक्त्यांनी पवारांना टार्गेट केलंय. ते करताना त्यांनी पुरावा म्हणून बृजभूषणसिंह आणि शरद पवार, सोबतच सुप्रिया सुळे (Sharad Pawar) यांचे फोटोज ट्विट केलेत. हे फोटो महाराष्ट्रातलेच आहेत जेव्हा बृजभूषणसिंह तीन दिवस कुस्त्यांसाठी पुण्यात होते. सापळा कुणी रचला आणि रसद कुणी पुरवली याची चर्चा खूप काळापासून महाराष्ट्रात आहे पण त्यावर मनसेच्या शिखर नेतृत्वात आणि प्रवक्त्यांमध्ये एकमत नाही की, राज ठाकरे पुण्यात बोलले त्यावेळेस त्यांना सापळा कळालाच नव्हता? आणि आता कळालाय तर तो ते प्रवक्त्यांच्या माध्यमातून सांगतायत? काहीही असो- राज ठाकरेंचे पुण्यातले वक्तव्य आणि आजचे मनसे प्रवक्त्यांची वक्तव्यानं सापळ्याचा संभ्रम दूर होण्याऐवजी आणखी वाढला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

एक खासदार उठतो आणि तो विरोध करायला लागतो हे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरेंनी पुण्यात केलं. याचाच अर्थ त्यांना असं म्हणायचं होतं की बृजभूषणसिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या परवानगशिवाय असं करणे शक्यच नाही. हे थेट संकेत होते. त्यानंतर राज ठाकरे असही म्हणाले की, अयोध्येला गेल्यानंतर त्यांच्यावर, तसेच मनसे कार्यकर्त्यांवर केसेस टाकण्याचं षडयंत्र होतं. याचाच अर्थ असाही होतो की, योगींच्या पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या असत्या. राज ठाकरेंनी हे उघड उघड पण आडवळणाने सांगितलं. त्यानंतर राज असही म्हणाले की, बृजभूषणला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. पण ती कुणी पुरवली ते मात्र स्पष्ट सांगितलं नाही. पण त्याची चर्चा मात्र झाली. फडणवीस आणि शरद पवारांचं नाव चर्चेत आलं. फडणवीसांचं नाव यासाठी चर्चेत आलं की, बृजभूषणला रसद पुरवण्याची हिंमत इतर कुणात होईल? जर योगी, बृजभूषण हे एक असतील तर मग महाराष्ट्रातून त्यांना मदत इथलं भाजपचच नेतृत्व करेल ना? काँग्रेस-शिवसेना कशी करेल? त्यांनी पुरवायची ठरवलं तरी योगी ठाकरे-काँग्रेसचं ऐकतील का?

हे सुद्धा वाचा

पवारांनी रसद पुरवली?

पुण्यातली सभा संपून आता दोन दिवस झालेत. मनसेच्या प्रवक्त्यांना मात्र आज अचानक शरद पवारच हे सापळ्यामागे असल्याचा साक्षात्कार झालाय. त्यांनी बृजभूषणसिंह आणि पवार एकत्र असतानाचे फोटो ट्विट केलेत. पण मनसेच्या प्रवक्त्यांचं खरं मानायचं तर मग भाजपला हेही मान्य करावं लागेल की त्यांच्या पक्षाचा एक मोठा आणि महत्वाचा खासदार त्यांचं न ऐकता शरद पवारांचं ऐकतो आणि स्वत: च्या पक्षाला जुमानत नाही. अशा खासदारावर भाजप कारवाई का करत नाही? पवार राज ठाकरेंच्याविरोधात म्हणजेच त्यांच्या राजकीय मित्राच्याविरोधात रसद पुरवत असताना भाजपाचं नेतृत्व गप्प का राहीलं? ह्या सगळ्या प्रकरणात कुठल्याही बाजूनं पाहिलं तर गोची ही भाजपचीच झालेली दिसतेय.

रसदवर खुद्द बृजभूषणसिंह काय म्हणाले?

खुद्द बृजभूषणसिंह यांनी मात्र शरद पवारांसोबतचे त्यांचे असलेली संबंध नाकारलेले नाहीत. उलट त्यांनी आधी छातीठोकपणे सांगितलं की, शरद पवार हे बडे दिलवाला आहेत. आज मनसेच्या प्रवक्त्यांनी आरोप केल्यानंतर तर बृजभूषणसिंहांनी होय, माझे शरद पवारांसोबत संबंध आहेत आणि मला त्याचा अभिमान असल्याचं म्हटलंय. एवढच नाही तर राज ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं. ते देशातले एक महत्वाचे नेते आहेत हे सांगायलाही बृजभूषणसिंह विसरले नाहीत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांनी ऑन कॅमेरा राज ठाकरेंच्या विरोधात जे काही चाललंय ते त्यांच्या पक्षाच्या सांगण्यावरूनच करत असल्याचं मान्य केलंय. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी कितीही शरद पवारांवर आरोप केले तरी सापळा भाजपकडून तो सहजासहजी पवारांकडे सध्या तरी सरकताना दिसत नाहीय.