
नाशिकचा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात हा भोंदूबाबा आता पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्याच्या दैवी शक्तींच्या फसवणुकीचा पर्दाफाश होत आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांना फसवणारा या भोंदूबाबाने आता एसआयटी (SIT) पुढे गुडघे टेकलेले दिसत आहे. रविवारी त्याची तब्बल ७ तास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी मोठमोठ्या बढाया मारणारा खरात एक-दोनदा क्षीण आवाजात "नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला" असं कसेबसे म्हणताना दिसला. बोलायची ताकदही नसल्याचं त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता प्रकरणावर राजकीय वर्तुळात देखील चर्चा पाहायला मिळते.

अशोक खरात या प्रकरणात राज्यातील अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि काही अधिकारीही खरातच्या जाळ्यात अडकले असल्याचे संकेत मिळत आहेत. आता पुरोगामी विचारांचे ठाम समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या भोंदूबाबाबद्दलची आपली 'आपबिती' उघड केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड म्हणाले, "अशोक खरात मला सुद्धा वारंवार बोलावत होता. एकदा तर मी शहापूरपर्यंत गेलो होतो. पण माझं नशीब चांगलं, मंत्रालयातून फोन आला आणि मी मधेच माघारी फिरलो. लोकं खूप कौतुक करत होते म्हणून मी पाहायला जाणार होतो."

ते पुढे म्हणाले, "नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता. मी त्याच्या पायात पडणार होतो. हा साधे चिंचुके पॉलिश करून अंगठीमध्ये घालायचा आणि त्याचे १ लाख रुपये घ्यायचा. मी चाकणकर यांच्यावर बोलणार नाही, पण उगाच का काही घडतं? जयंत पाटील, निलेश लंके... सगळ्यांचेच फोटो आहेत." आव्हाड यांनी हे प्रकरण 'एपस्टीन फाइल्स'पेक्षाही मोठे असल्याचे संकेत दिले. खरातच्या फसवणुकीत अनेक प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले.

नाशिक पोलिसांची SIT सध्या तपास वेगाने करत असून, खरातच्या नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तपास सुरू असून, अधिक खुलासे लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.