कळसूबाई ते गिरनार…; अवघ्या पावणे तीन वर्षांच्या चिमुरड्याने रचला इतिहास, महाराष्ट्राच्या छोट्या मावळ्याचा पराक्रम
मावळच्या ३ वर्षीय रायाजी घारेने ५० गड-किल्ले सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. कळसूबाई आणि साल्हेर सारखी शिखरे सर करणाऱ्या या चिमुकल्या मावळ्याची प्रेरणादायी कहाणी.

जिद्द, धाडस आणि अचाट इच्छाशक्तीच्या जोरावर मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या रायाजी सुधीर घारे याने महाराष्ट्राच्या गिरीरोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.

रायजीने आतापर्यंत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. त्यामुळे रायाजीची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये सर्वात लहान गिरीरोहक म्हणून नोंद झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रायाजीने आपल्या मोहिमेदरम्यान विलक्षण चपळता दाखवली आहे. त्याने अवघ्या ४० दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरातमधील अत्यंत कठीण मानली जाणारी तीन सर्वोच्च शिखरे सर केली.

११ जानेवारी २०२४ रोजी त्याने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई (५,४०० फूट) अवघ्या ४ तास २० मिनिटांत सर केले. त्यानंतर २७ जानेवारीला साल्हेर किल्ला (५,१५७ फूट) आणि २ मार्च २०२४ रोजी गुजरातमधील गिरनार शिखर (३,६६६ फूट) ५ तास १ मिनिटांत सर करून सर्वांना अचंबित केले.

रायाजीच्या या साहसी प्रवासाची सुरुवात वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासूनच झाली होती. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने 'दुर्गराज रायगड' सर करून आपली पहिली मोहीम फत्ते केली.

वडील सुधीर घारे, आई प्रिया आणि बहीण श्रीजा यांच्या सोबतीने त्याने ही दुर्गभ्रमंती सुरू ठेवली आहे. गड-किल्ल्यांच्या ओढीमुळे हा चिमुकला आता महाराष्ट्रातील गड वेड्यांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.

रायाजीच्या कळसूबाई आणि साल्हेर मोहिमेची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली आहे. दरम्यान, गिरनार मोहिमेची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती त्याचे वडील सुधीर घारे यांनी दिली.

रायाजीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ३५० हून अधिक किल्ले पाहावेत, हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही त्याच्या वडिलांनी नमूद केले.