50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट
50 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, राजेश खन्ना आणि जीनत अमान यांच्या जोडीने रचला होता इतिहास, प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडत गाणं.

जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आजही कायम असून 1970 च्या दशकातील अनेक गाणी आजच्या पिढीलाही तितकीच भावतात. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावपूर्ण शब्दरचना आणि मधुर संगीत यामुळे ही गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाहीत तर ती लोकांच्या आयुष्याचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग बनली.

अशाच अजरामर प्रेमगीतांपैकी एक म्हणजे ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले’ हे गाणं. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या आवडीच्या यादीत अग्रस्थानी आहे.

हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले असून याचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांनी दिले आहे. तर या गाण्याचे हृदयस्पर्शी शब्द प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत.

या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर करण्यात आले होते. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री, निरागस भावभावना आणि प्रेमाचे सुंदर चित्रण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. विशेष म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण धावत्या रेल्वेत करण्यात आले होते, जे त्या काळात विशेष आकर्षण ठरले.

त्या काळात रेडिओ, चित्रपट संगीत कार्यक्रम आणि विविध समारंभांमध्ये हे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जात असे. आजही यूट्यूबसह विविध संगीत प्लॅटफॉर्मवर हे गाणे मोठ्या आवडीने ऐकले जाते. जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीलाही या गाण्याने वेड लावलं आहे.