आजकाल लग्न ही…; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली
अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तो येत्या 5 जुलै रोजी लग्न करणार आहे. यावर अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. वयाच्या 61 व्या वर्षी तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. वयाची साठी ओलांडल्यानंतर लग्नाचा निर्णय घेणं सोपं नसतं. यावर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

'आयएएनएस'ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने आमिरला त्याच्या तिसऱ्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "त्याला खूप सारं यश आणि आनंद मिळो, अशी माझी इच्छा आहे. आमिरला खूप खूप शुभेच्छा. तो खूप धाडसी आहे. पुन्हा एकदा मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं ही एक सुंदर गोष्ट आहे, यावर माझा विश्वास आहे. हे एक वरदान आहे आणि त्याला खूप प्रेम मिळो."

"आजकाल लग्न ही गरज राहिलेली नाही, तर तो एक पर्याय बनला आहे. जोपर्यंत तुम्ही स्वत: स्थिर होत नाही, तोपर्यंत तुम्ही नातेसंबंधात स्थिरता आणू शकत नाही. लोक मला नेहमी विचारतात की मी घटस्फोटानंतर दुसरं लग्न का नाही केलं? मी त्यांना सांगते की माझं लग्न कलेशी झालं आहे. कधीकधी माझी कला विषारी असते, कधी कधी आर्थिकदृष्ट्या अस्थिर असते, तर कधी कधी ती पूर्णपणे अकल्पनीय असते. कोणताच जोडीदार सहजतेने याचा स्वीकार करणार नाही", असं ती पुढे म्हणाली.

सुचित्रा कृष्णमूर्तीने निर्माते शेखर कपूर यांच्याशी 1999 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण खात्री होत नाही की तुम्हाला बदल स्वीकारायचे आहेत आणि कोणासोबत तरी आयुष्य घालवायचं आहे, तोपर्यंत लग्न करण्याची गरज नसल्याचं मत तिने यावेळी मांडलं आहे. आज लग्न हा एक पर्याय आहे, गरज नाही, असं ती पुढे म्हणाली.

ज्या व्यक्तीला खरंच असं वाटतं की तो दुसऱ्या व्यक्तीसोबत आपलं उर्वरित आयुष्य घालवू शकतो, त्यानेच लग्न करावं. लग्न करण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीसोबत कुटुंबालाही नीट समजून घेतलं पाहिजे. अनेकदा कुटुंबांमधील संघर्षांमुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये समस्या निर्माण होतात, असा सल्ला सुचित्राने दिला.