
बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बीड जिल्ह्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. दिवंगत नेत्या केसरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि इतर नेत्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

आता विद्यमान खासदारांच्या कार्यकाळात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. यामुळे, बीड जिल्ह्यातील प्रवाशांना अहमदनगर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये जाता येणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे बीड आणि परिसरातील नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

अहमदनगर ते बीड हा प्रवास आता अधिक सोयीस्कर जलद आणि सुरक्षित झाला आहे. या प्रवासाला अंदाजे 5 तासांचा वेळ लागणार आहे. या रेल्वेमुळे मालवाहतूक सोपी झाली आहे.

त्यामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

या मार्गावर एकूण 16 रेल्वे स्थानके आहेत. जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी (नवगण) आणि बीड ही या रेल्वेवरील महत्त्वाची स्थानकं आहेत. यामुळे आसपासच्या गावांनाही शहरांशी सहज जोडणं शक्य होणार आहे.

अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. यात अमळनेर ते बीड हा 67.78 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी 1286 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

आता यातील दुसऱ्या टप्प्यात 15 मोठे पूल, 90 छोटे पूल, 15 रोड ओव्हर ब्रिज आणि 31 रेल्वे अंडर ब्रिजची कामे सुरू आहेत.

या रेल्वेच्या उद्घाटनामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी देऊन बीडकरांची स्वप्नपूर्ती केली आहे.