
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. त्या एक लोकप्रिय गायिका आहेत, समाजसेविका आहेत. अनेक कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी होतात. त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता या ट्रोलिंगवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी जाऊन स्वच्छता मोहिम राबवली. त्यांचे हे काम कौतुकास्पद होते. पण, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

अमृता फडणवीस यांनी नुकतेच इंडिया टुडेच्या कार्यक्रमात ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. “माझ्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्याबाबतीत ओव्हर रिअॅक्ट होतात. अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात.”

“स्वच्छता मोहीम, पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा संदेश आणि समाजातील घटकांचे एकत्र येणे हा मुख्य विषय होता. पण ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवून, माझ्या कपड्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करुन आणि फोकस करुन माझ्या कपड्यांची चर्चा सुरु केली. हे वाईट सोशल मीडिया हँडल्स कुप्रसिद्ध आहेत, त्यांना यासाठी पैसे दिले जातात आणि ते त्यानुसार वागतात” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

ज्या महिलेकडे स्वतःचा आवाज आहे, जी समस्या व्यवस्थित समजू शकते, तिला ट्रोलर्स लक्ष्य करणारच, असे मत अमृता म्हणाल्या. “हे केवळ माझ्याबाबतीत नाही, तर प्रत्येक स्वतंत्र महिलेला लागू होते. जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो, तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो,” असे त्या म्हणाल्या.

“मला हे ट्रोलर्स बॅकग्राउंड म्यूझिकसारखे वाटतात. तुम्ही ते कर्कश्य आहे, असे समजून त्रास करून घ्यायचा की, त्यावर नाच करत ठेका धरायचा, हे तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्ही त्यांना टाळूही शकता किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकता. काय करायचे, हा पूर्णपणे तुमचा निर्णय असला पाहिजे.”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

“देवेंद्रजी महिला सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. शिवाय, माझ्या सासरच्या लोकांनी आणि माझ्या पालकांनी आम्हाला आमची स्पेस दिली आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेवर मला घरी स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या विचारांचा आदर करतो”, असेही त्या म्हणाल्या.