
रामानंद सागर निर्मित सुप्रसिद्ध टीव्ही रिरियल 'रामायण' मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी मार्च 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे.

तत्पूर्वी रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी श्रीरामांची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यांची ती भूमिका इतकी गाजली होती की त्यामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांचं गोविल यांच्याशी भावनिक नातं आहे. गोविल यांनी एकदा सांगितलं होतं की, त्यांना रामानंद सागर यांनी सर्वात प्रथम मालिका 'विक्रम और वेताल' मध्ये राजा विक्रमादित्यची भूमिका दिली होती. ती भूमिका गाजल्यानंतर 1987 मध्ये त्यांना रामायण मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारायला मिळाली.

अरुण गोविल यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झाला. मेरठ कॉलेजमध्ये शिकतानाच त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा सतावत होती. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. टीव्हीमधील या रामाचे अभिनय क्षेत्रातील काम आज थांबले असले तरी ते लोकांच्या हृदयात आजही त्याच रुपात ठाण मांडून आहेत.

रामायण मालिकेबाबत बोलायचं झालं तर या मालिकेच्या एका भागासाठी त्याकाळीही 9 लाख रुपये लागायचे. या मालिकेचं शुटिंग जवळपास 550 दिवस चाललं होतं. ही मालिका गुजरातच्या उमरगाव इथं चित्रित करण्यात आली होती. 80 च्या दशकात रामायण मालिकेची जी गोडी होती ती आजही लोकांच्या मनात कायम आहे.

अरुण गोविल यांची ओळख खरं तर उत्कृष्ट अभिनेता, प्रोड्युसर म्हणून राहिली आहे. त्यांनी हिंदी, भोजपुरी, ब्रज भाषा, ओडिया आणि तेलगु भाषेत काम केलं आहे. मात्र, रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना चित्रपटात भूमिका मिळेना झाल्या. त्याचं कारण लोक त्यांना श्रीरामाच्या रुपातच पाहू लागले होते. ही बाबत अरुण गोविल यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितली आहे.