एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अरुण गोविल यांना आता ‘रामायण’साठी फक्त इतकी फी
Ramayana: अभिनेते अरुण गोविल हे नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात राजा दशरथ यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळालं, ते जाणून घ्या..

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारून घराघरात पूजनीय ठरलेले अभिनेते अरुण गोविल आता पुन्हा एकदा पडद्यावर रामायणाची गाथा साकारत आहेत. मात्र यावेळी ते श्रीराम यांच्या भूमिकेत नव्हे तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत आहेत.

ऐंशीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनवर 'रामायण' ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा एका एपिसोडचा खर्च जवळपास नऊ लाख रुपये इतका होता. त्यावेळी संपूर्ण स्टारकास्टमध्ये अरुण गोविल यांनाच सर्वाधिक मानधन मिळत होतं. 'न्यूज 18'ने दिलेल्या वृत्तानुसार, तेव्हाच्या काळात अरुण गोविल यांना 40 लाख रुपये मानधन मिळायचं.

आता नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत महागडा चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा बजेट तब्बल 4000 कोटी रुपये इतका आहे. 'सियासत'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांना जवळपास 2.5 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

तसं पाहिलं तर 1987 पासून 2026 पर्यंत अरुण गोविल यांच्या मानधनात सहापट वाढ झाली आहे. परंतु नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात इतर कलाकारांना मिळणारं मानधन हे अरुण गोविल यांच्यापेक्षा जास्त आहे.

'रामायण' या चित्रपटात श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आहे. याशिवाय यामध्ये लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, रकुल प्रीत सिंह, रवी दुबे यांच्याही भूमिका आहेत.