
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव चरम सीमेपर्यंत पोहोचला असून, त्याचे जागतिक बाजारपेठेवर तीव्र पडसाद उमटत आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असल्याने जगभरात इंधन दरवाढीची भीती व्यक्त होत आहे. युद्धामुळे स्ट्रीट ऑफ होरमुझसारख्या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक बिघडण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. भारतासारख्या आयातित तेलावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये याचा थेट परिणाम दिसून येत आहे. बाजारातील ही अस्थिरता अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांना हादरवून सोडत आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल दर वाढण्याची चर्चा रंगली आहे. मात्र मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील पेट्रोल पंपांवर दर स्थिर आहेत. आजही मुंबईत पेट्रोलचा भाव १०३.५० रुपये प्रति लिटर कायम आहे.

तेल कंपन्यांनी किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तरीही जागतिक बाजारातील चढउतार लक्षात घेता भाव वाढण्याची शक्यता कायम आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर या जागतिक तणावाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या आयात खर्चात वाढ झाल्यास महागाई वाढू शकते आणि रुपयाचे अवमूल्यन होण्याची भीती आहे. सध्या तरी तेल कंपन्यांनी दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजार हलला तर दरवाढ अपरिहार्य ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही स्थिरता सध्या दिलासादायक आहे, पण भविष्यात काय होईल याची अनिश्चितता कायम आहे. युद्ध किती काळ टिकेल आणि त्याचा तेल पुरवठ्यावर काय परिणाम होईल, यावरच पुढील दर ठरतील. सध्या तरी सरकार आणि तेल कंपन्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. युद्ध संपल्याशिवाय बाजारातील अस्थिरता कायम राहील, असा इशारा अर्थतज्ज्ञ देत आहेत.