असा सुख सोहळा स्वर्गी नाही..; वारीची ही दृश्ये तुम्ही पाहिली नसतील..
डोळ्यांचं पारणं फेडणारा वारीचा अलौकिक सोहळा दरवर्षी आषाढ महिन्यात पहायला मिळतो. माऊली-माऊली असा जयघोष करत टाळ-मृदुंगाच्या आवाजाने आसमंत दणाणून जातो. या वारीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वैष्णवांच्या अपार भक्तीचा सोहळा, गळ्यात तुळशीची माळ अन् मुखी विठ्ठलाचं नाव.. असं दृश्य म्हणजे वारी. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये ईश्वरप्रेमाची विलक्षण अनुभूती होते.

जवळपास 18 ते 20 दिवस संसारीक सुख, वैभव, चिंता हे सर्व सोडून फक्त हरिनामाचा जप करत लाखो वारकरी वारीला निघतात. वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली, असं मानलं जातं.

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून लाखो वारकरी राज्यभरातून जातात. वारकऱ्यांसाठी ही वारी म्हणजे जणू एक उत्सवच असतो. विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना असते. नाचत, गाजत, खेळत हे वारकरी दिंडीत सहभागी होतात.

वारीतील सर्वांत महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगळ सोहळा. वारीत सहभागी होणाऱ्या मराठा सरदारांनी रिंगळ सोहळ्याची परंपरा सुरू केली. हे रिंगण अत्यंत शिस्तीने पार पडतं. या रिंगणाचे दृश्य कॅमेरात टिपले गेले आहेत.

गणेश वानरे या फोटोग्राफरने वारीची ही सुंदर दृश्ये कॅमेरात कैद केली आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली वारीची ही परंपरा अत्यंत शिस्तीने आणि चोख पद्धतीने पार पडते. यात कुठेही गोंधळ होत नाही. संपूर्ण वारीची ही व्यवस्था म्हणजे एक अभ्यासाचा विषय आहे.