भर मंडपात हरवलं मंगळसूत्र, अभिनेत्रीला अश्रू अनावर; होणाऱ्या नवऱ्यावरच चिडली
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर नुकतीच एका शोमध्ये लग्नबंधनात अडकली. परंतु या लग्नसोहळ्यादरम्यान मंगळसूत्र हरवल्याने तिला अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं, मंगळसूत्र तिला सापडलं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना एपिसोडमध्ये मिळणार आहेत.

'बालिका वधू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौरला तिच्या स्वप्नांचा राजकुमार भेटला आहे. या दोघांनी 30 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्हीच्या 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये लग्न केलं. परंतु त्यांचा हा लग्नसोहळा पुढील आठवड्यात प्रसारित केला जाणार आहे.

अभिनेत्री हिना खान आणि ईशा मालवीय यांनी अविकाचा पती मिलिंद चंदवानीचे चप्पल लपवले. यासोबतच लग्नाच्या या खास एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बरीच धमाल आणि मस्ती पहायला मिळणार आहे. राखी सावंत, फराह खान पाहुणे बनून त्यात सहभागी होणार आहेत.

अविकाच्या लग्नसोहळ्यात ऐन मुहूर्ताच्या वेळी असं काही घडलं, जे पाहून तिला अश्रू अनावर झाले. भर मंडपात अविकाचं मंगळसूत्रच हरवलं. हे पाहून तिला धक्काच बसतो आणि ती रडू लागते. यावेळी ती होणाऱ्या नवऱ्यावर बेजबाबदार असल्याचा आरोप करते.

मंडपात जेव्हा मिलिंद मंगळसूत्राचा बॉक्स उघडतो, तेव्हा त्यात काहीच नसतं. लग्नाच्या विधीदरम्यानच मंगळसूत्र गायब झाल्याने अविका रडू लागते. ती मिलिंदला विचारते, "मंगळसूत्र कुठे आहे?" त्यावर तो माहीत नसल्याचं उत्तर देतो. हे उत्तर ऐकून अविका त्याच्यावर चिडते.

"तुला एकच जबाबदारी दिली होती, तीसुद्धा नीट पूर्ण करता आली नाही" असं म्हणत अविका मिलिंदवर चिडते. त्यानंतर ती ढसाढसा रडू लागते. सेटवरील सर्वजण चिंतेत येतात. मंगळसूत्र हरवल्याचा हा ड्रामा एक प्रँक होता की खरंच असं घडलं, हे एपिसोड प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.