
छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतचा हा दुर्मिळ ऐतिहासिक वारसा सध्या धोक्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीअभावी या संग्रहालयातील अनेक मौल्यवान वस्तूंचे नुकसान होत आहे. ज्यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हे संग्रहालय मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. येथे जपून ठेवलेल्या प्राचीन वस्तूंमध्ये मौल्यवान नाणी, अप्रतिम चित्रकला, ऐतिहासिक तोफा, तसेच उत्कृष्ट लाकडी शिल्पकला आणि शस्त्रे यांचा समावेश आहे.

मात्र अनेक दशकांपासून राजकीय स्तरावर उपेक्षा झाल्यामुळे या अमूल्य ठेव्यावर संकटाची छाया पसरली आहे. या संग्रहालयाच्या इमारतीत आणि लाकडी वस्तूंमध्ये वाळवीने मोठे साम्राज्य पसरवले आहे. यामुळे लाकडी कलाकृती आणि शोकेस वेगाने खराब होत आहेत.

इमारतीच्या खराब अवस्थेमुळे पाण्याची गळती आणि अत्यधिक आर्द्रता वाढली आहे. कीटकनाशक फवारणीच्या अभावामुळे अनेक नाजूक वस्तूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या मौल्यवान कलाकृतींचे पुढील नुकसान टाळण्यासाठी अनेक नाजूक वस्तू शोकेसमधून काढून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, पर्यटकांना त्या पाहता येत नाहीत.

हे ऐतिहासिक संग्रहालय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (मनपा) अंतर्गत येते. मात्र, मनपा प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून या वारशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संग्रहालयाच्या इमारतीची १९९९ नंतर म्हणजेच जवळपास २५ वर्षांमध्ये एकदाही रंगरंगोटी किंवा मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक या संग्रहालयाला भेट देत आपला ऐतिहासिक वारसा जवळून अनुभवण्यासाठी येत असतात. मात्र, पुढाऱ्यांकडून आणि संबंधित प्रशासनाकडून शिवरायांच्या नावावर राजकारण केल्याचे पाहायला मिळते.

पण त्यांच्याच काळातील आणि परिसरातील ऐतिहासिक वारसा जपण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी आता त्वरित प्रशासकीय स्तरावर ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.