
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी त्यांनी राज्यातील बांधवांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन... महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला... मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी आवर्जून कोव्हिड परिस्थितीचा उल्लेख करताना लॉकडाऊनचा पुन्हा एकदा इशारा दिला. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

लसीकरणाने वेग घेतलाय… काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालंय… राज्यात लसीकरणाचा उच्चांक होतोय... आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, कोरोनाला हद्दपार करणारच, असा नवा नारा त्यांनी यावेळी दिला.