डार्लिंग डार्लिंग दिल क्यों तोडा..; ‘धुरंधर’मधल्या डायलॉगचा मजेशीर किस्सा, आदित्य धरने दिले होते इतके पर्याय
'धुरंधर' फ्रँचाइजीमधील चित्रपटांमध्ये अभिनेता गौरव गेराने आलम भाईची भूमिका साकारली. या भूमिकेचा एक डायलॉग तुफान गाजला. 'डार्लिंग डार्लिंग दिल क्यूँ तोडा' या डायलॉगमागची कहाणी गौरवने सांगितली आहे.

'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटांमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशीच एक गाजलेली भूमिका आलम भाईची आहे. अभिनेता गौरव गेराने ही भूमिका साकारली आहे. आलम भाईचा 'डार्लिंग डार्लिंग.. दिल क्यों तोडा' हा डायलॉग चांगलाच गाजला आहे.

गौरवने या डायलॉगमागील मजेशीर कहाणी सांगितली आहे. हा डायलॉग सहज लिहिण्यात आला नव्हता. तर त्यामागे आदित्य धरचा खोलवर विचार आणि अतरंगी कल्पना होत्या. गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. चित्रपटाच्या तयारीदरम्यान आदित्यने त्याला काही मजेशीर पर्याय पाठवले होते, त्याचाच हा स्क्रीनशॉट आहे.

गौरवने त्याच्या भूमिकेच्या यशाचं श्रेय आदित्य धरलाच दिलं. त्याने शेअर केलेल्या यादीत यमक जुळणारी इतकी मजेशीर वाक्ये आहेत, जे वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. आदित्यने गौरवला निवडण्यासाठी अनेक मजेशीर संवाद दिले होते. 'एक ने किया दिल ब्रेक, तो दुसरी को पिलाओ आलम फ्रूट शेक', 'हो गए इश्क में फे, पियो पिस्टल पाइनएप्पल' यांसारखे भन्नाट डायलॉग आदित्यने पाठवले होते.

'अंडे से निकला चुजा, खा लो खा लो क्रीम खरबूजा', 'पियो आंवला का मामला, बन जाओ जूही चावला' असे इतरही भन्नाट डायलॉग्स आदित्यने लिहिले होते. गौरवला अनेकदा 'डार्लिंग डार्लिंग'वाला डायलॉग कोणाची कल्पना होती, असा प्रश्न विचारला जातो. आता त्यामागचं सत्य त्यानेच उघड केलं आहे. आदित्य धरने शूट सुरू करण्याआधी गौरवला अनेक पर्याय दिले होते.

'धुरंधर'च्या फ्रँजाइजीमध्ये गौरव गेराने मोहम्मद आलम ऊर्फ आलम भाईची भूमिका साकारली आहे. गौरव टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता असून त्याला प्रेक्षकांनी विनोदी भूमिकांमध्ये सर्वाधिक पाहिलं होतं. त्यामुळे 'धुरंधर'मधील त्याची भूमिका पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.